माणगावात कचऱ्याचे साम्राज्य

स्वच्छतेच्या बाबतीत सीसीटीव्ही यंत्रणा अपयशी; नागरिकांमध्ये नाराजी

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव शहराच्या सुरक्षेसाठी आणि शहराला अधिक सुरक्षित, स्वच्छ व शिस्तबद्ध बनविण्याच्या उद्देशाने सुमारे दोन वर्षांपूर्वी विविध चौक, प्रमुख रस्ते आणि संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. या तिसऱ्या डोळ्यामुळे चोरी, अपघात, वाहतूक कोंडी, गुन्हेगारी आणि सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर प्रभावी नियंत्रण मिळेल, अशी शहरवासीयांची मोठी अपेक्षा होती. मात्र सुरक्षेच्या बाबतीत काही प्रमाणात यश मिळाले असले, तरी स्वच्छतेच्या बाबतीत ही यंत्रणा अद्याप प्रभावी ठरत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून माणगाव पोलिसांना अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात मोठी मदत झाली आहे. चोरी, अपघात आणि वाहतूक नियमभंगाच्या अनेक घटनांमध्ये आरोपींचा माग काढणे सोपे झाले असून, वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासही या यंत्रणेचा उपयोग झाला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही व्यवस्था उपयुक्त ठरल्याचे दिसून येते. परंतु दुसरीकडे, शहरात सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांच्या कडेला, नाल्यांमध्ये आणि नदीकिनारी उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोबल वाढल्याचे चित्र आहे. परिणामी शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले असून, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन कचरा टाकणाऱ्या व्यक्तींना रंगेहाथ पकडले, त्यांचे फोटो आणि व्हिडिओ संबंधित प्रशासनाला दिले. मात्र त्यानंतरही दोषींवर ठोस कारवाई किंवा दंड न झाल्याने अशा प्रकारांना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

मोर्बा रोडवरील गोद नदीच्या किनाऱ्यावर आणि नदीपात्रातही मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे. विशेष म्हणजे, “येथे कचरा टाकण्यास सक्त मनाई“ असा फलक उभारलेला असतानाही त्याच फलकासमोर कचऱ्याचे ढीग दिसून येतात. या ठिकाणापासून अवघ्या काही अंतरावर दोन सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असूनही कचरा टाकणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे केवळ गुन्हे उघडकीस आणण्यासाठीच नव्हे, तर शहरातील स्वच्छता राखण्यासाठीही प्रभावीपणे वापरण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

संयुक्तपणे जबाबदारी स्वीकारणे गरजेचे
उघड्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्तींची सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ओळख करून त्यांच्यावर तातडीने दंडात्मक कारवाई करावी, तसेच अशी कारवाई सार्वजनिक करून इतरांनाही धडा मिळेल, अशी ठाम मागणी माणगावकरांकडून होत आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी प्रशासन, नगरपालिका आणि नागरिक यांनी संयुक्तपणे जबाबदारी स्वीकारल्यासच 'स्वच्छ माणगाव, सुंदर माणगाव' हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होऊ शकते.
Exit mobile version