चिरनेर गावात हाहाकार

350 च्या वर घरात शिरले पुराचे पाणी

| उरण | वार्ताहर |

अतिवृष्टीचा फटका हा ऐतिहासिक प्रसिद्ध चिरनेर गावाला बसला असून, गावातील सुमारे 350 च्या वर घरात पुराचे पाणी शिरण्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. रात्रीच्या सुमारास ओढवलेल्या अस्मानी संकटामुळे गावात एकच हाहाकार माजला आहे. अनेक रहिवाशांच्या जीवनावश्यक वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचरही पाण्याखाली गेल्याचे भयानक चित्र समोर येत असताना रहिवासी हे आपापल्या कुटुंबासह शेजारी मंडळींचे जीव वाचविण्यासाठी रात्रीच्या अंधारात धडपडत होते. मात्र, उपाययोजना करण्यासाठी सज्ज असणारी आपत्कालीन प्रशासनाला जागच न आल्याने रहिवाशांमध्ये सध्या संतापाची लाट उसळली आहे.

उरण तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळी झाले आहे. चिरनेर ते मोठी जुई आणि विंधणे (कंठवली) ते वेश्वी हा रस्ता पाण्याखाली गेला असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मंगळवारी रात्रीच्या सुमारास सर्वाधिक अतिवृष्टीचा फटका हा ऐतिहासिक प्रसिद्ध चिरनेर गावाला बसला असून, गावातील सुमारे 350 घरात पुराचे पाणी शिरण्याची घटना घडली आहे. यावेळी विद्युतपुरवठा खंडित झाल्याने गावात ओढवलेल्या अस्मानी संकटामुळे एकच हाहाकार उडाला. गावातील रहिवाशांच्या घरात चार ते तीन फुटांपर्यंत पाण्याची पातळी वाढल्याने रहिवासी हे आपापल्या कुटुंबासह शेजारी मंडळींचे जीव वाचवण्यासाठी रात्रीच्या अंधारात धडपड करत होते.भेंडखळ, म्हातवली ग्रामपंचायत हद्दीत ही पावसाचे पाणी शिरल्याची घटना घडली आहे. मात्र, या पूरपरिस्थितीची माहिती रहिवाशांनी आपत्कालीन प्रशासनाला दिल्यानंतर ही तातडीने उपाययोजना करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी तसेच संबंधित शासकीय खात्याचे अधिकारी तातडीने उपस्थित न राहिल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

Exit mobile version