क्रिकेट हा खेळ आता विश्वाच्या कानाकोपर्यात पोहोचला आहे. या खेळाची आता सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असतात. ऑस्ट्रेलियातील येत्या 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार्या विश्वचषक 20-20 ची तमाम क्रिकेट विश्व आतुरतेने प्रतिक्षा करीत आहे. स्पर्धेचे आव्हान स्वीकारलेले 12 देशांसह अन्य पात्रता फेरीत खेळणारे 4 देश, त्यांचे खेळाडू, पदाधिकारी, पंच, टेलिव्हिजन क्रू, अन्य सर्व संबंधित ऑस्ट्रेलियात डेरेदाखल झाले देखील… आणि अर्थातच या सर्व पाहुण्यांसोबत वरुणराजा अवतरला नसता तरच नवल!
भारत-पाकिस्तान लढ्यांची जशी आपण दोन देश प्रतिक्षा करीत असतो, तशीच प्रतिक्षा ऑट्रेलिया आणि न्यूझीलंड लढतीची असते. दोन्ही देशांमधून खरंतर क्रिकेटच्या बाबतीत विस्तवही जात नाही. जो आवेश, उत्साह भारत-पाक लढतीच्या वेळी पहायला मिळतो, तोच अनुभव ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड यांच्यातील सामना दरम्यान अनुभवायला मिळतो.
आणि त्यामुळे जगातील सर्व पाहुण्यांसोबतच वरुणराजाचेही आगमन सिडनी आणि मेलबोर्नला झाले आहे. खरंतर पाऊस नसेल तर क्रिकेटची लज्जत वाढतच नाही असं म्हणतात. पावसाळी रेनकोट, छत्र्या किंवा प्लॅस्टिकचा आडोसा घेऊन बसलेले प्रेक्षक तर खेळाडू, पंच, पदाधिकारी आपण काही प्रेक्षक ‘डकवर्थ-लुईस’ यांच्या सामना निकाली ठरविण्याच्या निकषाचा चार्ट घेऊन बसलेले दिसतात. एकीकडे हे दृश्य तर प्रत्यक्ष मैदानात खेळपट्टी, गोलंदाजाचा रनअप, झाकणे, खेळाच्या दोन्ही स्क्वेअरच्या फ्लॅटवर कव्हर्स आच्छादणे. आदी कामांची घाईगडबड सुरु असते. प्रत्यक्ष पावसाने हजेरी लावल्यानंतर तर ग्राऊंड साफसफाईची तारांबळ उडते. मैदानावर पडत असलेला पाऊस थांबला की अल्पावधीत मैदान खेळण्यायोग्य परिस्थितीत आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असते. निसर्गापुढे निसर्गाच्या आव्हानांशी सामना करीत असतानाचा तो संघर्ष पाहणेही रोमांचकारी अनुभव असतो. भारत-श्रीलंका, बांगलादेश, वेस्टइंडिज सारख्या देशांमध्ये एकेकाळी ग्राऊंड स्टाफ हातामध्ये छोटे छोटे कपड्याचे तुकडे घेऊन पाणी पुसताना दिसायचे. आता मात्र जग खूपच पुढे गेले आहे. आज माणसे कमी लागतात परंतु मशिन्सचा वावर वाढला आहे. एकटा ‘सुपर सॉकर’ मैदानावरचे संपूर्ण पाणी शोषून घेण्याइतका सक्षम झाला आहे. हिटर्स लावून मैदान सुकवले जाते. खेळपट्टीवर छोटेखानी घरच छपरासारखे ठेवले जाते व खेळपट्टीवर हवा खेळती राहील हे पाहिले जाते. तरी देखील कधी कधी निसर्गच विजयी होतो.
22 ऑक्टोबरला सिडनी येथे होणार्या लढतीमध्ये पावसाचे आगमन निश्चितच मानले जाते. सामना निकाली होण्यासाठी दोन्ही संघाच्या वाट्याला किमान 5-5 षटके येणे आवश्यक आहे. त्यापेक्षाही गंभीर परिस्थिती भारत-पाकिस्तान यांच्यातील मेलबोर्न येथे होणार्या सामन्यात असेल. 90 टक्के पावसाचे भाकीत त्या दिवशी हवामान खात्याने केले आहे. त्याआधीच्या दिवशीही पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे ओलसर मैदान सुकविण्याचे मोठेच आव्हान मेलबोर्नच्या ग्राऊंड स्टाफ पुढे असेल. अशावेळी सामना किती षटकांचा होणार याचा अंदाज कुणीच बांधू शकत नाही. आणि कमी षटके होऊ शकणार्या सामन्याची संघ निवड हा सर्वात मोठी डोकेदुखी असते. कारण कमी वॉर्नअप होऊन आपली फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात यामध्ये जुळवून घेणारा खेळाडू संघासाठी मोठा असतो. त्यावेळी असे खेळाडूच सामना निर्णायक ठरवित असतात. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि भारत-पाकिस्तान या संघाची सध्या त्यादृष्टीनेच आखणी सुरु आहे.