हृदयविकार 127 तर इतर आजार 751 शस्त्रक्रिया
। रायगड । प्रतिनिधी।
शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम फेब्रुवारी 2013 पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामध्ये रूपांतरित झाला आहे. या कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वर्षांपर्यंतच्या लाभार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाते. जन्मतः व्याधींचे निदान करून त्यावर उपचार करणे, आवश्यक घटकांची कमतरता आणि वाढत्या वयातील शारीरिक, मानसिक, बौध्दिक अपुरा विकास याची तपासणी केली जाते. तपासणीत गंभीर आजार आढळल्यास 18 वर्षांपर्यंतच्या मुलांची हृदय शस्त्रक्रिया मोफत करून दिली जाते. या कार्यक्रमातून सन 2021-22 ते 2023-24 या तीन वर्षांत वयाच्या 18 वर्षांपर्यंत 878 मुलांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या त्रिसूत्रीला केंद्रस्थानी ठेवून सध्याच्या विज्ञान युगात आरोग्य यंत्रणा वाटचाल करीत आहे. त्यातच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुला-मुलींची वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जात आहे. यात विविध आजारांचे वेळीच निदान आणि उत्तम उपचार केले जात आहेत. या कार्यक्रमातून सन 2021-22 ते 2023-24 या तीन वर्षांत वयाच्या 18 वर्षांपर्यंत बालकांचे हृदयविकाराच्या 127 तर इतर आजाराच्या 751 बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. 1 एप्रिल 2013 पासून राज्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सुरू करण्यात आला. या कार्यक्रमात 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात पंधरा तालुके असून 30 पथके कार्यरत आहेत. प्रत्येक पथकात दोन वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका व औषध निर्माता यांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालय,तालुकास्तरावरील ग्रामीण तसेच उपजिल्हा रुग्णालये येथे या पथकांचे मुख्यालय करण्यात आले आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत 0 ते 18 वयोगटातील बालकांची संपूर्ण आरोग्य तपासणी केली जाते. सदर पथकाने 2023-24 या वर्षात जिल्ह्यात अंगणवाडी 3,334 अंगणवाडी तपासणी 837 अंगणवाडी मधील 1,69,560 बालकापैकी 37,895 बालकांची तपासणी केली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात 3,111 शाळा असून त्यापैकी 1,949 शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी केली आहे. शाळेतील एकूण विद्यार्थी संख्या ही 2,77,473 असून त्यापैकी शाळेतील विद्यार्थी 1,54,814 विद्यार्थी यांची तपासणी करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील या तीस आरोग्य पथकाद्वारे ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडीतील बालकांची व शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तसेच ग्रामीण किंवा उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येतात. मुलांचा मृत्यू दर कमी व्हावा. साखळी पद्धतीने प्रत्येकाला उत्तम व वेळीच आरोग्य सेवा मिळावी हा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा उद्देश आहे. बालवयातील व्याधींचे निदान करून त्यावरून उपचार केले जातात. यामध्ये आढळलेले आजार, आवश्यक घटकांची कमतरता जन्मतः शारीरिक व्यंग आणि वाढत्या वयातील शारीरिक, मानसिक, बौध्दिक अपुरा विकास याची तपासणी करून गरज भासल्यास उपचार केले जातात. या कार्यक्रमांतर्गत शेकडो विद्यार्थ्यांवर उपचार झाले आहेत. अलिबाग सहित जिल्ह्यातील बालकांचा यामध्ये समावेश आहे. तपासणी दरम्यान बालकांमध्ये काही आजार आढळल्यास खारघर व मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून या बालकांवर शस्त्रक्रिया केल्या जातात. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचा जिल्हा सम्वयक अधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग अंगणवाडी तपासणी - 837 शाळा तपासणी - 1,949 अंगणवाडी बालक तपासणी - 37,895 शाळेतील विद्यार्थी तपासणी - 1,54,814
अंगणवाडीतील बालकांची तपासणी केली जाते. तपासणीत गंभीर आजाराचे रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर त्वरित मोफत उपचार केले. जातात. हृदयरोगाचा रुग्ण आढळल्यास शासनामार्फत मंजूर योजनेंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. अंगणवाडीतील बालकांची तपासणी वर्षांतून दोनवेळा केली जात आहे.
डॉ. अंबादास देवमाने,
जिल्हा शल्यचिकित्सक,