Toll news …ही तर कोकणवासीयांची थट्टा; चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर संताप

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

गेली 17 वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम, रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, धुळीचे ढग, वाहतूक कोंडी आणि अपघातांचे वाढते प्रमाण असताना सरकार बिनदिक्कतपणे टोल वसुली सुरु करत आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. या प्रकारामुळे कोकणवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली असून शेतकरी कामगार पक्ष या निर्णयाचा जाहीर निषेध करीत असल्याचे मत शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केले. या महामार्गाची खरंतर गिनिज बुकमध्ये नोंद झाली पाहिजे, असा टोलाही त्यांनी सरकार आणि प्रशासनाला लगावला. रस्ताच पूर्ण नाही, मग टोल कसला घेताय? जनतेला सुविधा नाहीत, सुरक्षा नाही, वेळेची बचत नाही मग हा टोल नेमका कशासाठी? असा थेट सवाल करत चित्रलेखा पाटील यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे गाजर दाखवत कोकणवासीयांना वर्षानुवर्षे वेठीस धरण्यात आले. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी काम संथ गतीने सुरू आहे. काही भागात तर रस्ते उखडून ठेवले असून नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. दररोज अपघात होत आहेत, वाहनांचे नुकसान होत आहे, रुग्णवाहिका वेळेत पोहोचत नाहीत, व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे; मात्र सरकार आणि ठेकेदार यांच्याकडून केवळ आश्वासनांची खैरात सुरू आहे.
कोकणातील जनता कर भरते, टोल भरते, पण बदल्यात मिळतंय काय? धूळ, खड्डे आणि मृत्यूचा सापळा! ही विकासाची भाषा नसून जनतेच्या पैशावर चाललेली निर्दयी वसुली आहे, असा घणाघात चित्रलेखा पाटील यांनी केला.

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना महामार्गाच्या अपूर्ण कामांमुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा नसल्याने रस्ते चिखलमय होत आहेत. वाहनचालकांना तासन्‌‍तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे.

‘सरकारला कोकणवासीयांच्या जीवाची किंमत उरली आहे का? अपूर्ण रस्त्यावर टोल वसूल करणे म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. आता कोकणातील जनता गप्प बसणार नाही’, असा इशारा देत चित्रलेखा पाटील यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली तात्काळ बंद करावी, अपघातग्रस्त कुटुंबांना मदत द्यावी आणि निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

फक्त घोषणा अन्‌‍ वाढीव बजेट
प्रत्येक वर्षी नवीन मुदत, नवीन घोषणा आणि वाढीव बजेट करण्याचं काम ठेकेदाराने केले आहे. 17 वर्षांत या महामार्गाचे काम पूर्ण करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. काम पूर्ण करण्यापेक्षा खर्च वाढवण्याचीच स्पर्धा सुरू आहे. ठेकेदार आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. अपूर्ण रस्त्यावर टोल वसुली म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, असा संतप्त आरोपही चित्रलेखा पाटील यांनी उपस्थित केला.
Exit mobile version