। सुकेळी । वार्ताहर ।
नागोठणे शहरासह ग्रामीण भागामध्ये महावितरणने सध्या विजेचा खेळ खंडोबा मांडळा असून दर अर्ध्या- एक तासाच्या अंतराने तर कधी पाच ते दहा मिनिटांनी वीज पुरवठा खंडित होत आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. या वारंवार सुरू असलेल्या विजेच्या लंपंडावामुळे महावितरण मस्त तर नागरीक त्रस्त असे चित्र पहावयास मिळत आहे. वीज खंडित होण्याची कोणतीही ठराविक वेळ नसून रात्री बेरात्री कधीही वीजपुरवठा खंडित होत आहे. सद्यस्थितीत रात्रीच्या वेळेत अनेक वेळा वीजपुरवठा हा अर्ध्या तासासाठी किंवा चार ते पाच तासांसाठी खंडित होत आहे. महावितरणाच्या या गळथान कारभारामुळे नागरीकांमधुन संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान वीज पुरवठा खंडित का झाला याची माहिती घेण्यासाठी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला असता फोन अनेकदा बंद असल्याचा अनुभव ग्राहकांना येत आहे. त्यामुळे नागरिक चांगलेच वैतागले आहेत.