। रेवदंडा । प्रतिनिधी ।
अग्नीविर म्हणून भारतीय नौसेनेत नुकतीच निवड झालेल्या श्रावणी जयवंत घरत हिचा चौल-रेवदंडा ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. अग्नीवीर म्हणून भारतीय नौदलात कार्यरत होणारी अलिबाग तालुक्यातील पहिलीच असून तिचा सार्थ अभिमान आहे. तसेच श्रावणीचा नागरी सत्कार भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरवा, असे उद्गार माजी राजिप विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी काढले.
रेवदंडा आंग्रेनगर येथील रहिवाशी असलेली श्रावणी जयवंत घरतची भारतीय नौसेनेत जहाजावरील फायटर जेटमध्ये मिसाईल लोड करणे, उत्पादन व देखभाल विभागात एविएशन (एअर ऑरडिनन्स) या पदावर अग्नीविर म्हणून कोची येथे कार्यरत होणार आहे. तिच्या भारतीय नौसेनेध्ये झालेल्या अग्नीवीर निवडीचे कौतूक व अभिमान सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
याप्रसंगी माजी राजिप विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, प्रफुल्ल मोरे, शरद गोंधळी, अशोक नाईक, संदिप खोत, प्रसाद गोंधळी, वैभव चुनेकर, मंगेश वडके, प्रमोद म्हात्रे, तेजस शिंदे, निलेश गाडे, जनार्दन कोंडे, जयवंत घरत आदी मान्यवर मंडळीची उपस्थिती होती.