आदिवासी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून, त्यांच्या उन्नतीकरिता आदिवासी विकास विभागासाठी 11 हजार 199 कोटींची तरतूद सन 2022-2023 मध्ये केली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.

नंदुरबार नगर परिषदेच्या नुतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी श्री. छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे ते बोलत होते. कार्यक्रमास आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भूसे, खा. डॉ. हिना गावीत, खा. राजेंद्र गावीत, आ. किशोर दराडे, आ. किशोर पाटील, आ. मंजुळा गावीत आदी मान्यवरांसह नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आदिवासी समाजासाठी अर्थसंकल्पात भरघोस निधीची भरीव केली आहे. राज्यातील विकासकामांना गती व चालना देण्याचे काम हे सरकार करीत आहे. सरकार आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित-शोषित अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे. सर्व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मागील चार महिन्यांत 400 पेक्षा अधिक शासन निर्णय काढले असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवीवर्षानिमित्त राज्यातील 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत एसटी बस प्रवासाची योजना सुरू केली. 52 दिवसांमध्ये या योजनेचा एक कोटीपेक्षा अधिक ज्येष्ठांनी लाभ घेतला. दिवाळीसाठी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ केवळ 100 रुपयात देण्यात आला असून, अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत मिळावी याकरिता नुकसानीची मर्यादा 3 हेक्टर पर्यंत वाढविण्यात आली आहे. नुकसानभरपाईपोटी जवळपास 30 लाख शेतकर्‍यांना सहा हजार कोटींची मदत देण्यात आली आहे. नियमित कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेऊन एकाच वेळी सुमारे सात लाख शेतकर्‍यांच्या खात्यात 2500 कोटी रुपये जमा केले असून, लघुसिंचन योजनेचे वीज बिल प्रति युनिट एक रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकर्‍यांचा सेंद्रीय शेतीकडे कल वाढवा म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी केले. यावेळी नगरपरिषदेच्या वतीने सर्व मान्यवरांचा छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांची प्रतिमा तसेच शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

Exit mobile version