मुख्यमंत्र्यांनी परिवारासह केली विठ्ठलाची शासकीय महापूजा
| पंढरपूर | प्रतिनधी |
राज्यातील नवं सरकार हे जनतेचं आणि सर्वसामान्यांचं आहे. आपल्या राज्यातील अनेक लोकांमध्ये बुद्धिमत्तेचे प्रमाण अधिक आहे. याचा उपयोग आपण राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी करु, असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. रविवारी ते पंढरपुरात जनतेशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी पंढरपूरच्या विकास आराखड्यासंदर्भात भाष्य केलं. पंढरपूरचा विशेष विकास आराखडा बनवणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी सपत्नीक विठ्ठल,रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांसोबत शेतकरी मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले यांना महापुजेचा मान मिळाला. मुरली नवले हे गेल्या अनेक वर्षांपासून पायी वारी करत आहेत.
महापूजेनंतर झालेल्या कार्यक्रमत बोलताना शिंदे म्हणाले की, मी 24 तास जनतेसाठी काम करणारा मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्रातील जनतेचा सेवक असल्याच्या भावनेनं मला हे काम करायच आहे. त्यामुळे या कामात मला जनतेची मदत लागणार आहे, तुम्ही ती कराल असा विश्वासही आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
पुढे ते म्हणाले की, सरकारची प्रतिमा वाढली पाहिजे. शासना आणि प्रशासन ही रथाची दोन चाके असल्याने ती समान वेगाने धावायला हवीत. दोन्ही चाके गतीने धावली तरच राज्याच्या विकासालाही गती येईल. पंढरपुर हे आपल्यासारख्या गोरगरिबांचे दैवत आहे. 10 लाखांपेक्षा अधिक लोक दिसत आहेत. या वारकर्यांसाठी स्वच्छ निरोगी वातावरण असलं पाहिजे. त्यासाठी पंढरपूरच्या विकासासाठी एक विशेष विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे भविष्यात या तीर्थक्षेत्र सर्व सोयीनियुक्त असेल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.