महाविकास आघाडीचा सर्वसमावेशक उमेदवार

कोल्हापूरच्या आखाड्यात शाहू महाराज

| कोल्हापूर | प्रतिनिधी |

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात महाविकास आघाडीतर्फे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज छत्रपती यांना सर्वसमावेशक चेहरा म्हणून उभे करण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. विशेष म्हणजे, शाहू महाराज यांनी मलाही लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा होती असे जाहीर करीत संभ्रम कायम ठेवला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या बंडानंतर येत्या शनिवारी 25 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात शरद पवार यांची जाहीर सभा पार पडणार आहे. विशेष म्हणजे, या सभेचे अध्यक्षपद कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे भूषवणार आहेत. यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मात्र, शाहू महाराज छत्रपती यांनी मला यापूर्वी लोकसभा लढवण्याची इच्छा होती, असं म्हणत उमेदवारीसंदर्भात राजकीय चर्चा आणि संभ्रम कायम ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची मुहूर्तमेढ रोवलेल्या कोल्हापुरात पक्षाच्या स्थापनेपासून कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागेवर वर्चस्व होतं. मात्र, राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर आगामी काळात होऊ घातलेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेच्या जागेवर महविकास आघाडीकडून उमेदवार कोण असणार याबाबतच्या चर्चा सुरू आहेत.

शिवाय, पक्ष मजबूत करण्यासाठी शरद पवार राज्यात दौरे करत आहेत. यासाठी येत्या 25 ऑगस्ट रोजी शरद पवार यांची कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौक मैदानात जाहीर सभा होणार आहे. या सभेचे अध्यक्षस्थान कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज भूषवणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज श्रीमंत शाहू महाराजांना याबाबत विचारले असता, यापूर्वी राष्ट्रवादीकडून लढण्याची इच्छा होती, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. शिवाय, सभेच निमंत्रण मिळाले असल्याने मी सभेला जाणार आहे, असेही शाहू महाराज म्हणाले आहेत. शाहू महाराजांच्या या वक्तव्यामुळे संभ्रम कायम आहे.

..तर होऊ शकतो विचार
महाविकास आघाडीकडून जिल्ह्यातील दोन्हीपैकी एक जागा काँग्रेसला मिळावी, अशी मागणी काँग्रेस श्रेष्ठींकडून करण्यात येत आहे. मात्र, जर राष्ट्रवादीकडून शरद पवारांनीच थेट कोल्हापूरच्या जागेबाबत छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी दिल्यास सर्वसमावेशक चेहरा म्हणून श्रीमंत शाहू महाराजांचा विचार होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवाय, कोल्हापूरच्या राजघराण्याला राज्यात मोठा मानसन्मान आहे. यापूर्वी छत्रपती मालोजीराजे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवत विधानसभा गाठली होती. तर, आताच्या स्वराज पक्षाचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती यांना याआधी राष्ट्रपती कोट्यातून भारतीय जनता पक्षाने खासदारकी बहाल केली होती. यामुळे कोल्हापूरचे राजघराणे ज्या पक्षाच्या बाजूने कौल देईल, त्या पक्षाला जनाधार मिळणार असल्याने राजघराण्याला सोबत घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षात चढाओढ सुरू आहे.
जागावाटपावरुन मविआत समन्वय
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून कोणताही वाद नसल्याचा दावा काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांनी केला आहे. लोकसभेसाठी तिन्ही पक्ष तयारी करीत आहेत. तिन्ही पक्षांकडून 48 जागांवर चाचपणी केली जात असल्याचे पाटील म्हणाले. सतेज पाटील म्हणाले की, लोकसभेसाठी तिन्ही पक्ष तयारी करत आहेत. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लोकसभेचा फॉर्म्युला ठरणार आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून राज्यात कोणताही वाद राहणार नाही. महाविकास आघाडीचे 40 खासदार कसे निवडून येतील यासाठी आमचा प्रयत्न आहे. 25 ऑगस्टला शरद पवार कोल्हापुरात आल्यानंतर आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्यांचे उत्साहात स्वागत करणार आहोत. कोल्हापूरकरांचे नेहमीच त्यांच्यावर प्रेम राहिले असल्याचे त्यांनी नमूद केले.
Exit mobile version