श्रीमंत शाहू महाराज यांचे प्रतिपादन
उद्या मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा
कोल्हापूर | प्रतिनिधी |
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटेल. पंतप्रधानांनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं, अशी प्रतिक्रिया श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी वक्त केली.तर शुक्रवारी 18 जूनला मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत चर्चा करणार असल्याचे खा.संभाजीराजे यांनी जाहीर केले.मात्र तोपर्यंत आंदोलन सुुरुच राहणार असल्याचेही ते म्हणाले.
ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टात आपल्या विरोधात निकाल लागला आहे. आता त्याच ठिकाणाहून आपण सुरुवात केली पाहिजे. फेरविचार याचिकेत खूप वेळ जाईल, त्यातून काही निष्पन्न होणार नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटू शकेल. नवीन कायदा आणल्याशिवाय आता काही होणार नाही. इतक्या घटना दुरुस्त्या केल्या मग आता का करत नाही हे समजत नाही. या मुद्द्यावर पंतप्रधान यांचं काय मत आहे हे समजलं पाहिजे.
कोल्हापुरात खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वातील मराठा समाजाच्या या मूक मोर्चात राज्यभरातील मराठा समन्वयक सहभागी झाले होते. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही आंदोलनाला हजर होते. तसंच कोल्हापुरातील आमदार, खासदारांनीही मूक मोर्चाला उपस्थिती लावली होती. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी आपापलं मनोगत व्यक्त करताना मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच भूमिका मांडली.जनतेमध्ये, समाजात नाराजी वाढली होती. संभाजीराजे यांनी रायगडावरुन घोषणा केल्यानंतर आम्ही सौम्य पद्धतीने काम करण्याच्या सूचना केल्या. महाराष्ट्राने एकमुखाने समोर गेलं पाहिजे. हा आवाज मुंबईपर्यंत पोहोचला आहे, आता दिल्लीपर्यंत जायला पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटीमध्ये सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं. राज्य सरकार या मुद्द्यावर सकारात्मक आहे. जे योग्य आहे ते मराठा समाजाला मिळेल, असं शाहू महाराज यांनी सांगितलं
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटेल. पंतप्रधानांनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं. नवीन कायदा आणल्याशिवाय आता काही होणार नाही. इतक्या घटना दुरुस्त्या केल्या मग आता का करत नाही हे समजत नाही. या मुद्द्यावर पंतप्रधान यांचं काय मत आहे हे समजलं पाहिजे.
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज