पणनकडून कापूस खरेदीची शक्यता कमीच!
।अमरावती । वृत्तसंस्था ।
सध्या खुल्या बाजारात कापसाला चांगला दर मिळत असल्याने आणि भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) थेट बाजारात खरेदीसाठी उतरल्याने राज्य कापूस पणन महासंघाच्या खरेदीची शक्यता कमीच असल्याचे चित्र आहे.
कापसाची किमान आधारभूत किंमत धाग्यानुसार 5800 ते 6300 आहे. त्याहून अधिक म्हणजे जवळपास 30 टक्के जास्त भाव मिळत आहे. बाजारात व्यापारी भाव पाडतील तेव्हा पणनच्या खरेदीची खरी गरज राहील. सध्या त्याची गरज नसल्याने पणनची कापूस खरेदी सुरू करण्यात आलेली नाही, अशी माहिती पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी दिली.
हमीभावापेक्षा कमी किंवा हमीभावाइतके भाव कोसळल्यास त्यादृष्टीने पणन महासंघाने तयारी व नियोजन केले आहे, असे देशमुख यांनी सांगितले. या खरीप हंगामात राज्यात 39.37 लाख हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली. मागील हंगामात 42.08 लाख हेक्टर होता.
सध्या पंजाब, हरयाणा व राजस्थानमध्ये कापसाला 7,200 ते 8,300 रुपये क्विंटल तर मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्रात 7,500 ते 8,500 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. खुल्या बाजारात शेतकर्यांना हमी भावापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने साहजिकच पणन महासंघाच्या केंद्रांकडे कोणी धाव घेणार नाही. त्यामुळे अद्याप पणनची खरेदी सुरू झालेली नाही. वेळप्रसंगी ती सुरू करण्याची तयारी आणि नियोजन झाले असल्याचे अनंतराव देशमुख यांनी सांगितले.
1990 मध्ये एकाधिकार संपुष्टात आल्यानंतर पणन महासंघाची कापूस खरेदी शून्यावर आली होती. पण, करोना प्रादुर्भावात सर्वत्र टाळेबंदी असताना 2020 च्या हंगामात मात्र कापूस पणन महासंघाने विक्रमी खरेदी केली.
मनुष्यबळाची समस्या
2005 मध्ये पणन महासंघात स्वेच्छानिवृत्ती योजना आली. त्यावेळी 4,822 कर्मचार्यांपैकी 3,990 कर्मचार्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने 832 कर्मचारीच उरले. ही संख्याही कालांतराने कमी कमी होत आता 117 कर्मचार्यांवर आली आहे. त्यात 66 ग्रेडर आहेत.