। लखनऊ । वृत्तसंस्था ।
लखीमपूर खेरी हिंसाचारासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आशिष मिश्राच्या अटकेची शेतकरी नेत्यांनी मागणी केली होती. दरम्यान, आशिष मिश्रासह शेतकर्यांविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. लखीमपूरमधील आंदोलनात मिश्रा यांच्या मालकीच्या एका कारसह तीन एसयूव्हीच्या ताफ्याने शेतकर्यांना धडक दिली आणि हा संघर्ष झाला. या तीन गाड्यांपैकी एक गाडी आशिष मिश्रा चालवत असल्याचा दावा शेतकर्यांनी केला आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी सांगितले की, लखीमपूर खेरीमध्ये जेव्हा हिंसाचार झाला तेव्हा त्यांचा मुलगा घटनास्थळी नव्हता. शेतकर्यांशिवाय मारल्या गेलेल्या इतर चार जणांमध्ये भाजपा कार्यकर्ते आणि एक कार चालकाचा समावेश होता. आंदोलनात शेतकर्यांमध्ये काही समाजकंटक तलवारी आणि काठ्या घेऊन होते, त्यांनी हल्ला केल्याने इतरांचा मृत्यू झाल्याचा दावा अजय मिश्रा यांनी केला आहे.