। माणगाव । सलीम शेख ।
गेली 15 दिवस सतत पडणार्या मुसळधार पावसामुळे माणगावातील काळ नदीत मगरींचा वावर वाढला आहे. त्यामुळे या मगरींना पाहण्यासाठी पर्यटकांसह शाळकरी मुले तसेच स्थानिकही गर्दी करीत आहेत.
गेले अनेक दिवस या नदीत सतत मगरी दिसत असून या नदीत मगरींचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील पुलावर मगरी पाहण्यासाठी नागरिक, विद्यार्थांची एकच गर्दी होत आहे. माणगाव काळनदीमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने गेल्यावर्षी मोर्बा रोड, गांधी राईस मिल, खांदाड आदिवासीवाडीकडे जाणार्या मार्गावर सहा फूट लांबीच्या भल्या मोठ्या मगरीचे दर्शन झाले होते. त्यामुळे माणगाव परिसरात गेल्या दोन वर्षांपासून मगरीचा वावर वाढला असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे.
गेल्या 8 दिवसापूर्वी माणगाव नगरपंचायत हद्दीतील सुतार आळी भागात मुंबई-गोवा महामार्गावर रामदेव स्टील सेंटर समोर मगरीला एका अज्ञात वाहनाची धडक लागल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेची माहिती मिळताच माणगाव वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन मृत अवस्थेतील या मगरीला आपल्या वाहनातून शव विच्छेदनासाठी माणगाव पशु वैद्यकीय सर्वचिकित्सालय दवाखान्यात आणले होते. हि मगर 127 सेमी असून तिचे वजन 20 किलो होते. त्यानंतर 22 जुलै 2022 रोजी दुपारी 12.00 वाजण्याच्या सुमारास पुन्हा मगर काळनदी पात्राकडेला सुकलेल्या गवतावर स्मशानभूमी जवळ कांही पादचार्यांना दिसली. याच वेळी महाविद्यालयातील विद्यार्थी घराकडे निघाले होते. त्यांनी हि मगर बघण्यासाठी एकच गर्दी काळनदी पुलावर केली होती. या नदीत मच्छीमारीसाठी गेलेल्या मच्छी मारांना या मगरींनी जखमी केल्याच्या घटना यापूर्वी अनेकवेळा घडल्या आहेत. या नदीकाठी अनेकांची घरे आहेत. तसेच निकम इंग्रजी माध्यमाची स्कूल आहे. त्यामुळे या मगरीचे संवर्धन शासनाने करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.