। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
टाकाऊ करवंटी आणि सुपारीच्या पानांपासून बनविलेल्या विविध पर्यावरणपुरक शोभिवंत आणि वापरातील वस्तूंना जागतिक पसंती मिळाली आहे. आतापर्यंत देशभरातील विविध बाजारपेठांबरोबरच अमेरिका आणि इंग्लडपर्यत या दर्जेदार वस्तू पोहोचल्या आहेत. ही किमया परूळे (ता.वेंगुर्ले) प्रथमेश नाईक यांनी करून दाखविली आहे. कोकणात नारळ आणि सुपारी लागवडीखाली मोठे क्षेत्र आहे; परंतु नारळातील खोबरे काढुन घेतल्यानंतर करवंटीचा सर्र्हास सर्पणासाठी वापर केला जातो. नारळांच्या झावळांपासुन केरसुणी बनविल्या जातात. मागील काही वर्षांत नारळ सोडणांपासून काथ्या निर्मितीचे प्रकल्प देखील उभे राहिले आहेत.
सुपारीच्या तर केवळ फळाचाच वापर केला जातो. सुपारीची पाने वायाच जातात; परंतु जिल्ह्यातील परूळे येथील प्रथमेश नाईक यांनी सिध्द ग्रो कंपनीची स्थापना करीत या कंपनीच्या माध्यमातुन करवंटी आणि सुपारीच्या पानांपासून विविध वस्तूंची निर्मिती केली आहे. सुपारीच्या पानांपासून पर्यावरणपुरक पत्रावळी, नाष्ट्यांच्या डिश, द्रोण, बाऊल्स, चमचे अशी विविध उत्पादनांची निर्मिती करीत थर्माकॉलच्या वस्तूंना त्यांनी पर्यावरणपुरक वस्तुंचा सक्षम पर्याय निर्माण केला आहे.
सुरूवातीच्या काळात त्यांना या उत्पादनांना बाजारपेठ मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागले; परंतु जसेजसे या वस्तूची उपयुक्तता ग्राहकांना समजू लागली तसतशी या वस्तुची विक्री आपसुकच वाढत गेली. करवंटीपासुन तयार केलेल्या शोभिवंत वस्तुंना राज्यांसह देशात मागणी आहेच; परंतु जागतिक पातळीवर देखील मोठी पसंती मिळाली आहे.
अमेरिका, इंग्लडमध्ये त्यांच्या वस्तू निर्यात होतात. शेकडो पर्यटक पर्यावरण वापरातील वस्तू आणि शोभिवंत वस्तू परूळे येथे येत खरेदी करतात. या त्यांच्या प्रयोगाचा शेतकर्यांना देखील फायदा झाला आहे. सुपारीची पाने शेकडा 60 ते 80 रुपयाने खरेदी करतात. शेतकर्यांच्या बांधावर जावुन ते खरेदी करीत असल्यामुळे शेतकर्यांना त्याचा फायदा होतो. यापुर्वी हॉटेल व्यावसायिक करवंटी फेकुन द्यायचे; परंतु करवंटीपासुन शोभिवंत वस्तु बनविण्यास सुरूवात केल्यापासुन या करवंट्या ते खरेदी करतात. गेली अकरा वर्ष ते व्यवसायात आहेत.