। मुंबई । वृत्तसंस्था ।
तांदळाला कृत्रिम वास किंवा वासाचा द्रव लावून तो ‘बासमती’ तांदूळ असल्याचे भासवून ग्राहकांची लूट केली जात असल्याचा प्रकार पुढे येत आहे. वासाच्या अपेक्षेने ग्राहक 16 ते 18 रुपये किलोचा कणी तांदूळ 35 ते 40 रुपयांनी खरेदी करतात. दुसरीकडे बासमती पिकणार्या राज्यात लांबलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, पुरवठा कमी झाला आहे. वाढती मागणी आणि अपुर्या पुरवठ्यामुळे बासमतीच्या दरात क्विंटलला 300 ते 600 रुपयांची वाढ झाली आहे.
राईस मिलमध्ये पडलेली कणी आजबाजूच्या आणि गुजरातच्या मार्केटमधून येते. हीच कणी पॉलिश करून वास यावा म्हणून ‘व्हंड परिमल’ नावाचे सुवासिक अत्तर लावले जाते. किंवा तांदळात काही वनस्पतीची पाने ठेवली जातात. ही पाने किमान 12 तास राहिल्यास तांदळाला वास येतो. असा तांदूळ पुढे वेगवेगळ्या ब्रँडच्या बॅगमध्ये भरून ‘बासमती’ म्हणून विकला जातो. ‘तुकडा बासमती’ या गोंडस नावाने ही विक्री केली जाते. दुकानात पोते खोलले तरी दरवळणारा वास काही दिवसांतच उडून जातो आणि दुकानदारांना मात्र ग्राहकांच्या तक्रारीला सामोरे जावे लागते.
दोन वर्षांत परतीच्या पावसाने भात पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात 20 टक्क्यांपर्यंत घट झाली. सध्या किरकोळ बाजारात लोकांना बासमती तांदूळ 60 ते 110 रुपये किलोने मिळत आहे. बासमती इतर तांदळापेक्षा जास्त खाल्ला जाणारा तांदूळ आहे, बासमती तांदळाचा भाव वाढला, असे व्यापार्यांचे म्हणणे आहे. सध्या बाजारात बासमती स्टीम आणि पॉलिश अशा तांदूळ बाजारात येतो. बासमती तांदूळ लग्न समारंभ, हॉटेल आणि बिर्याणीसाठी वापरला जायचा. काही वर्षांत घरगुती वापर वाढल्याने या तांदळाची मागणी वाढली आहे. सध्या बासमतीला मागणी अधिक आहे. घरगुती वापर आणि लग्नसराईमुळे मागणी वाढते, पण अनेक मिल बंद पडल्याने पुरवठ्यात घट होत आहे. वासाचा द्रव लावून बासमती तांदूळ येतो. हा प्रकार चुकीचा आहे.