अलिबाग तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
बदलत्या हवामानाचा मोठा फटका यंदा अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यावर्षी कांद्याच्या उत्पादनात सुमारे 25 टक्क्यांनी घट झाल्याची माहिती समोर आली असून, बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, कांदा उत्पादक शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे.
अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळे आणि परिसरातील भागातील पांढरा कांदा हा चविष्ट व औषधी गुणधर्मांनी समृद्ध म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या कांद्याला मुंबई, पुण्यासह राज्यातील तसेच देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर मागणी असते. नेहुली, खंडाळे, कार्ले, तळवली या गावांमध्ये प्रामुख्याने या कांद्याची लागवड केली जाते.

दोन वर्षांपूर्वी अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) मिळाल्यानंतर शेतकऱ्यांचा उत्साह वाढला होता. त्यामुळे यंदा 221 हेक्टरवरून तब्बल 316 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली. मात्र, पावसाचे आगमन उशिरा झाल्याने लागवडीवर विपरीत परिणाम झाला. त्यातून सावरण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला असला तरी बदलत्या हवामानाचा परिणाम पिकावर झाला.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा कांदा उशिरा तयार झाला आणि उत्पादनातही लक्षणीय घट झाली. सुमारे 25 टक्के उत्पादन घटल्याने बाजारात कांद्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. सध्या बाजारात काही ठिकाणी 200 रुपये, तर काही ठिकाणी 250 ते 300 रुपये प्रतिमाळ दराने कांद्याची विक्री होत आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली असून, आकारानुसार दर ठरवले जात आहेत. सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास पुढील महिन्यात पांढरा कांदा बाजारात उपलब्ध होणे कठीण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आखाती संघर्षाचा निर्यातीवर परिणाम
यंदा अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला दुबईसह आखाती देशांतून मोठी मागणी आली होती. दोन टनांहून अधिक कांद्याची मागणी नोंदवली गेली होती. मात्र, आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे ही मागणी अचानक रद्द करण्यात आली. त्यामुळे निर्यातीवर परिणाम झाला असून, शेतकऱ्यांना अपेक्षित बाजारपेठ गमवावी लागल्याची माहिती कांदा उत्पादकांनी दिली आहे.






