रणदीप गुलेरिया यांचा इशारादिल्ली पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
दिल्लीतील हवा प्रदुषण हे सिगारेटच्या धुरापेक्षाही धोकादायक बनल्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढण्याचा इशारा ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. तसेच या वाढत्या हवा प्रदुषणामुळे दिल्लीकरांचे आयुष्यमान सातत्याने घटत असल्याचा धोकाही त्यांनी व्यक्त केला आहे.
जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून राजधानी पहिला क्रमांक सोडायला तयार नाही, केंद्र व राज्य अशी दोन सरकारे असूनही ती डोळ्याला झापडे लावून बसलेल्याची चित्र आहे. त्यातच दिवाळीत फटाक्यांवर बंदी असूनही, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जागोजागी झालेल्या फटाकेबाजीमुळे दिल्लीची हवा धूसर दिसू लागली. सूर्यदर्शन होत नव्हते.
28 सप्टेंबर व 4 नोव्हेंबर दरम्यान बंदीचे उल्लंघन करणार्या 210 लोकांवर गुन्हे नोंदविण्यात आले. 143 जणांना अटक करण्यात आली. 489 किलो फटाके जप्त करण्यात आले. पोलिसांकडे नियम उल्लंघन करणार्यांबाबतच्या 1143 तक्रारी आल्या होत्या.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांसह संवाद साधताना गुलेरिया म्हणाले की, प्रदुषणाची पातळी जास्त असलेल्या ठिकाणी कोविडच्या संसर्गाचे प्रमाण वाढलेले दिसून आले आहे. रुग्णांच्या फुफ्फुसांमध्ये जास्त सूज आलेली दिसून येत आहे. यामुळे कोरोनाचा सहजतेने प्रसार होत आहे, कारण कोरोनाचा विषाणू हा प्रदुषकांना चिटकून बसतो आणि ते कोणालाही कळत नाही.
तर फटाके दिल्लीच्या प्रदुषणात कमी प्रमाणात भर घालत असल्याच्या दाव्यावर गुलेरिया म्हणाले की, गंगेच्या मैदानी प्रदेशात प्रदुषण खूप जास्त आहे. दिवाळीत फटाके उडवल्याने त्यात सातत्याने भर पडत आहे. सणांच्या काळात वाहने रस्त्यावर येण्याचे प्रमाणही वाढत आहे, जे प्रदुषणात भर घालत आहेत. याशिवाय, दिल्लीतील रहिवाशांच्या संभाव्य जीवनमानात घट झाली आहे. म्हणजेच दिल्लीकरांची फुफ्फुसे हवेतील प्रदुषणामुळे काळी पडत चालली असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिल्लीत हिवाळ्याची सुरूवात नोव्हेंबराच्या सुरूवातीपासून होते व तो जानेवारीच्या अखेरपर्यंत टिकतो. गेल्या वर्षी दिल्ली सरकारने वाहनांच्या बाबतीत ऑड अँड इव्हन हा लागू केलेला नियम अद्याप लागू करण्यात आलेला नाही. प्रदूषण शोषून घेणारी यंत्रेही दिल्लीतील काही भागातून उभारण्यात आली, तथापि, त्यांचा काही परिणाम झालेला नाही. गेल्या वर्षी तर आनंदविहार उपनगरात प्रदूषण पातळी 1000 वर गेली, तेव्हा त्याची नोंद करणारे यंत्र कोलमडून पडले. सन 2017 पासून यंदाची दिल्लीतील प्रदुषणाची पातळी खूपच वाईट आहे. यामध्ये फटाक्यांतून निघणारा विषारी धूर आणि शेतकर्यांनी पेंढ्या जाळल्याने झालेल्या धुराची भर पडत आहे. यामुळे चोवीस तासातील दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स हा 462 झाला आहे. सेन्ट्रल पोल्युशन कन्ट्रोल बोर्डने शुक्रवारी ही माहिती दिली.