| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील खाडीकिनारी वारंवार केमिकलमिश्रित विषारी पाणी सोडले जात असल्याने समुद्राच्या भरती, ओहोटीत येणारे-जाणारे मासे मरण पावत आहेत. त्यामुळे मासे खवय्यांनी आपला मोर्चा सध्या गोड्या पाण्यातील माशांकडे वळविला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. खवय्यांच्या पसंतीमुळे सध्या गोड्या पाण्यातील माशांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
उरण तालुक्यातील खोपटा, भेंडखळ, पागोटे खाडीकिनार्यावरील समुद्राच्या पाण्यात मागील काही दिवसांपासून केमिकलमिश्रित विषारी पाणी सोडले जात आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री भेंडखळ, नवघर, पागोटे बांधपाडा, कोप्रोली, दिघोडे व चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील खाडीकिनारी मोठ्या प्रमाणात समुद्रातील भरतीच्या वेळी येणारी विविध जातींचे मासे मृतावस्थेत आढळून आले आहेत. या घटनेसंदर्भात भेंडखळ ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते यांनी वारंवार संबंधित प्रशासनाकडे माशांच्या मृत्यूला जबाबदार असणार्या प्रकल्पावर, व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
परंतु माशांच्या मृत्यूसंदर्भात कोणत्याही प्रकारचा तपास न करता किंवा जबाबदार असणार्या प्रकल्प, कंटेनर यार्ड व्यवस्थापन किंवा व्यक्तीविरोधात तक्रार दाखल न करता महसूल विभागाचे अधिकारी, पोलीस यंत्रणा, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हे अज्ञान इसमाविरोधात तक्रार दाखल करुन हात झटकण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे खाडीतील केमिकल मिश्रित मासे खाण्याकडे काही अंशी खवय्यांनी पाठ फिरवली आहे. याचा फायदा उठवत गोड्या पाण्यातील मासेमारी करणार्या व्यवसायिकांनी आप आपल्या तलावातील गोड्या पाण्यातील मासे पकडण्याकडे व सदर पकडलेले मासे विक्री करण्यासाठी ठेवल्याने मासे खवय्यांनी आपला मोर्चा हा गोड्या पाण्यातील मासे खरेदीकडे वळविला असल्याचे चित्र विंधणे, मोठी जुई, धाकटी जुई, चिरनेर, दिघोडे, चिर्ले, कोप्रोली या ठिकाणी पहावयास मिळत आहे.