। चिपळूण । वार्ताहर ।
चिपळूण शहर, खेर्डी व परिसराला पूरपरिस्थितीचा फटका बसला. खेर्डी येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योगांच्या मालमत्तेचे सुमारे 500 कोटी रुपयांचे नुकसान झालेले असल्याने उद्योजकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. तरी उद्योजकांना आपले उद्योग पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्यासाठी कमी व्याज दरात दीर्घ मुदतीचे कर्ज उद्योजकांना द्यावेत, या मागणीसह अन्य मागण्या नॉर्थ रत्नागिरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अनिल त्यागी,गजानन कदम यांनी खासदार अरविंद सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .
अतिवृष्टी आणि महापुरामुळे चिपळूण शहरासह खेर्डी कळंबस्ते याचबरोबर 14 गावात मोठे नुकसान झाले आहे.यामध्ये खेर्डी औद्योगिक वसाहतीला देखील मोठा फटका बसला असून उद्योजकांचे मोठे नुकसान झाले आहे. खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील पूर परिस्थितीचा व नुकसानीची पाहणी खासदार सावंत यांनी करत येथील उद्योजकांशी संवाद साधला. यावेळी नॉर्थ रत्नागिरी इंडस्ट्रीज असोशिएशनचे त्यागी व गजानन कदम यांनी येथील उद्योजकांच्या नुकसानीबाबत माहिती देताना सांगितले की,अतिवृष्टी व पुरामुळे खेर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांचे सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे उद्योजकांसमोर मोठे संकटच ठाकले आहे. तसेच महापुरामुळे रस्ते उखडले आहेत. पथदीप मोडून पडले आहेत. पाईपलाईन जुनी झाली असून ती बदलायला हवी, अशी माहिती यावेळी दिली.तरी उद्योजकांना आपले उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांकडून कमी व्याजदरात दीर्घ मुदतीचे कर्ज मिळावे.विज बिलात व जीएसटीमध्ये सवलत मिळावी. औद्योगिक संदर्भातील सर्व कागदपत्रे विनाशुल्क उद्योजकांना तातडीने मिळावी, अशा मागण्या करताना निवेदन दिले. तसेच विमा कंपन्या देखील उद्योजकांना त्रास देत असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच पूर नियंत्रणासाठी काही मुद्दे निवेदनात उपस्थित करण्यात आले आहेत. यामध्ये नदीमधील गाळ काढण्यात यावा. डोंगर उतारावरती मृदू व जलसंधारणचे उपक्रम हाती घ्यावे. समतंल चर मारणे गरजेचे आहे. वृक्ष लागवड करावी जेणेकरून पावसाचे पाणी जमिनीत मुरेल व मातीची धूप कमी होईल.प्रस्तावित नवीन जल विद्युत प्रकल्प सुरू करण्यात यावेत. नदीमधून काढलेला गाळ दोन्ही तीरावर टाकून संरक्षक भिंत बांधावी लागेल. नदी तीरावर घट्ट वृक्ष लागवड करावी, या मुद्द्यांचा समावेश आहे.
यावर माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत यांनी आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, अशी ग्वाही दिली. तर उद्योजकांच्या झालेल्या नुकसानीचा पूर्ण अहवाल तयार करून मला द्या. उद्योजकांतर्फे राज्य व केंद्र सरकारकडे आपल्या नुकसानीबाबत पाठपुरावा करेन असे यावेळी उद्योजकांना आश्वासित केले. याचबरोबर विमा कंपन्यांना सेनेच्या भाषेतच सांगावे लागेल. त्यासाठी ते आपण आनंदाने करू,अशी ग्वाही उद्योजकांना सावंत यांनी दिली.
यावेळी सचिन कदम,शेखर कदम, तुकाराम डबाणे, विजय कदम. बी. के. पाटील, संदीप साळवी, रौफ खतीब, राहुल सावंत, शशिकांत देसाई अहमद दलवाई, निहाल मालाणी, मदन सोळंकी, राजू देवळेकर,उदय शेटे आदी उपस्थित होते.