500 चौरस फुटाच्या खोलीत कार्यालय
| पनवेल | विशेष प्रतिनिधी ।
कामोठे वसाहतीत असलेले पोस्ट कार्यालय अत्यंत कमी जागेत असल्याने पोस्टात येणार्या जेष्ठ नागरिकांची व पोस्टातील कर्मचार्यांची गैरसोय होत असल्याने हे कार्यालय शहराच्या मध्यवर्ती भागात प्रशस्त जागेत स्थलांतरीत करा अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अजिनाथ सावंत यांनी पोस्ष्ट अधिक्षकांकडे केली आहे. जवळपास तीन लाख लोकसंख्या असलेल्या कामोठे शहराचे पोस्ट कार्यालय अवघ्या 500 चौरस फुटाच्या खोलीत सुरू आहे. शहरापासून दुर असलेले नागरिकांना दळणवळणासाठी सोईचे होईल असे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कर्मचार्यांना काम करताना गैरसोय होणार नाही अशा वास्तूत पोस्ट कार्यालय स्थलांतरीत करावे अशी नागरिकांची इच्छा आहे.
शहरातील नागरिकांसाठी सेक्टर 5 येथे मारूती सोसायटीत विभागीय पोस्ट कार्यालय आहे. 500 चौरस फुटाच्या भाड्याच्या जागेत सुरू असलेल्या टपाल कार्यालया कर्मचार्यांची संख्या आणि कार्यक्षेत्राचा विचार करता सध्याच्या कार्यालयाची जागा अत्यंत तुटपंजी आहे. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून या टपाल कार्यालयाचे मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतर करण्याची आवश्यकता आहे. दररोज सुमारे एक हजार ते एक हजार 500 पत्र स्पीड व रजिस्टर्ड पोस्टने आणि सरासरी चार हजार पत्र साध्या टपाल सेवेने पाठवली जातात.
याशिवाय पार्सल व आधार कार्ड दुरूस्तीची सेवा दिली जाते. बचत खाते, आवर्ती ठेव आदी पोस्टाच्या योजनांच्या कामासाठी नागरिकांची गर्दी असते. टपाल कार्यालात 1 सब पोस्ट मास्टर, 2 सहाय्यक आणि 12 पोस्टमन असे 15 कर्मचारी काम करतात. या कर्मचार्यांना देखील कार्यालयात अत्यंत दाटीवाटीने काम करावे लागते. कार्यालयातील महत्वाचे लाखो रूपयांचे संगणक, सर्व्हर पावसात पाणी गळती होत असते. शहराची लोकसंख्या सुमारे तीन लाख असताना पोस्ट कार्यालय छोटे कसे असा प्रश्न उपस्थित होतो आहे. ज्येष्ठ नगरिक, निवृत्तीवेतन धारक व सर्वसामान्य नागरिकांना बसण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे पावसात, उन्हातान्हात ताटकळत उभे राहण्याशिवाय पर्यांय नसतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये याबाबत प्रचंड नाराजी आहे.
शहराच्या एका बाजुला कार्यालय
कार्यालय शहराच्या एका बाजुला असल्यामुळे येजा करण्यासाठी सार्वजनिक बससेवा नसल्यामुळे रिक्षाला 40 ते 60 रूपये खर्च करावे लागतात. वेळ आणि पैशा खर्च होतो. ज्येष्ठ नागरिकांना मासिक व्याज योजना, जेष्ठ नागरिक योजना, बचतखाते आदीसाठी वारंवार येजा करावी लागते. त्यामुळे टपाल कार्यालयाचे स्थलांतर करणे गरजेचे आहे.
केंद्र सरकार पोस्टाच्या विविध योजना नव्याने राबवित आहे, परंतू पोस्ट कार्यालयाच्या नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने कार्यालयाच्या अवस्थेकडेही लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. कर्मचारी आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कामोठे टपाल कार्यालय नवीन व शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी किमान 1100 ते 1200 चौरस फूट जागेत स्थलांतरित गरणे गरजेचे आहे. निवेदनावर विचार केला गेला नाही तर सह्यांची मोहिम राबवून पोस्टाला जागे करू.
– अजिनाथ सावंत