तालुका चिटणीस सुरेश घरत आक्रमक
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेदरम्यान सर्वसामान्य ग्राहकांवर सक्ती केली जात असून, विरोध करणाऱ्यांना शासकीय कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोप शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी महावितरणवर केला आहे. अलिबाग तालुक्यातील वरसोली आदिवासीवाडीत शनिवारी (दि.20) सकाळी घडलेल्या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेवर संताप व्यक्त करत सुरेश घरत यांनी स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबवावी, अन्यथा न्यायालयात धाव घेण्यात येईल, असा इशारा महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
महावितरण कंपनीकडून शहरी भागासह ग्रामीण भागात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून शनिवारी सकाळी वरसोली आदिवासीवाडीत महावितरणचे कर्मचारी स्मार्ट मीटर बसविण्यासाठी दाखल झाले होते. मात्र, याबाबत स्थानिक नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कर्मचारी मीटर बसविण्याचे काम करीत असताना काही आदिवासी ग्रामस्थ व महिलांनी याबाबत विचारणा केली. त्यावेळी शासकीय कामात अडथळा आणल्यास तक्रार दाखल करण्यात येईल, असे सांगण्यात आल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.
हे प्रकरण पुढे अलिबाग पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. घटनेची माहिती मिळताच अलिबागच्या प्रभारी नगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्यात बैठक आयोजित करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांच्या दालनात झालेल्या बैठकीला शेकापचे तालुका चिटणीस सुरेश घरत, अलिबाग नगरपरिषदेचे पाणी सभापती अनिल चोपडा, शोधन ठाकरे तसेच महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता तायडे व इतर अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी कोणतीही जनजागृती अथवा सूचना दिली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याची कारवाई करण्याची भाषा वापरून सर्वसामान्य नागरिकांना धमकावले जात असल्याचा आरोप करण्यात आला. महावितरणच्या मनमानी कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
स्मार्ट मीटरचे फायदे आणि तोटे याबाबत महावितरणकडून प्रभावी जनजागृती केली जात नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी स्मार्ट मीटरमुळे वीज बिले वाढत असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांच्या घरी स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती केली जात असून, अधिकारी व कर्मचारी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप ॲड. मानसी म्हात्रे आणि सुरेश घरत यांनी बैठकीत केला.
स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबविण्याची मागणी करत अन्यथा न्यायालयीन लढा उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावर पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत महावितरण कंपनीने स्मार्ट मीटरबाबत व्यापक जनजागृती करावी, नागरिकांमधील भीती आणि संभ्रम दूर करावा, असे निर्देश दिले. वृत्तपत्रे, ग्रामपंचायत बैठका आणि स्थानिक संवादाच्या माध्यमातून माहिती देण्यात यावी, जेणेकरून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्मार्ट मीटर बसविण्याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये. सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार थांबला पाहिजे. स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये मोठा संभ्रम असून, वीज बिले भरमसाठ येत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे महावितरणच्या या भूमिकेविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्यांच्या हक्कासाठी याचिका दाखल करण्यात येणार आहे.
– सुरेश घरत, तालुका चिटणीस, शेकाप







