| रोहा | प्रतिनिधी |
मागील दोन वर्षे सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने शेकापचा रायगड जिल्ह्यातील वर्धापनदिन कार्यक्रम साधेपणाने घरोघरी पक्षाचा ध्वज उभारून किंवा ग्रामपंचायतनिहाय करण्यात आला होता. यंदाच्या वर्षी मात्र कोरोना संकट काही प्रमाणात दूर होऊन जनजीवन सामान्य झाल्याने मोठ्या उत्साहात साजरा होणारा असून, या कार्यक्रमाच्या निमित्ताने पक्षाचे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा निर्धार शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी अलिबाग येथील पक्ष कार्यालयात झालेल्या प्रमुख पदाधिकार्यांच्या बैठकीत व्यक्त केला आहे.
शेकापचा वर्धापनदिन म्हणजे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी वैचारिक मेजवानीच असते. यामुळे पक्षाच्या तळागाळातील प्रत्येक कार्यकर्ता या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहात असतो. यावर्षीच्या वर्धापनदिन कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत प्राथमिक चर्चा करण्यासाठी जिल्हा चिटणीस मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. आ. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला आ. बाळाराम पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, पंडित पाटील, प्रा. एस.व्ही. जाधव, पक्षाचे कार्यालयीन चिटणीस अॅड. राजू कोरडे, जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील, जे.एम. म्हात्रे, प्रशांत नाईक, चित्रलेखा पाटील, निलिमा पाटील, चित्रा पाटील, अॅड. मानसी म्हात्रे, शिवानी जंगम यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका चिटणीस, जिल्हा चिटणीस मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी यावेळी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमाबाबत सूचना केल्या असून, 16 ते 19 जुलै यादरम्यान संपूर्ण जिल्ह्यात वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी सर्व तालुक्यात जिल्हा चिटणीस मंडळाचे पदाधिकारी दौरा करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.