कोट्यवधींच्या सुविधा…तरी रुग्णांचा जीव धोक्यात

गर्भवतीच्या मृत्यूनंतर नवी मुंबई मनपाच्या आरोग्य व्यवस्थेवर संताप

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

स्वच्छता, प्रशासन आणि नागरी सुविधांसाठी देशभरात पुरस्कार मिळवणारी नवी मुंबई महानगरपालिका आता आरोग्य सेवांच्या प्रश्नांमुळे चर्चेत आली आहे. वाशी येथील 300 खाटांचे प्रथम संदर्भ सार्वजनिक रुग्णालय तसेच ऐरोली, नेरूळ आणि बेलापूर येथील प्रत्येकी 100 खाटांची माता-बाल रुग्णालये असा मोठा आरोग्य विभाग असतानाही अनेक सुविधा पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याची गंभीर बाब समोर येत आहे.

मागील काही वर्षांत सुमारे 50 कोटी रुपये खर्च करून आधुनिक आयसीयू, ऑपरेशन थिएटर आणि इतर सुविधा उभारण्यात आल्या. मोठ्या थाटामाटात उद्घाटने झाली; मात्र या सुविधा प्रत्यक्षात किती वापरात आहेत, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

अलीकडे उपचारादरम्यान एका गर्भवती महिलेचा आणि तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्यानंतर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. प्राथमिक माहितीनुसार, महिलेची प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला ऐरोलीहून वाशी रुग्णालयात हलवावे लागले. त्यावेळी ऐरोलीतील आयसीयू आणि तज्ज्ञ वैद्यकीय सुविधा पूर्ण क्षमतेने उपलब्ध होत्या का, याबाबत आता चौकशी सुरू आहे.

याच आठवड्यात नेरूळमध्ये विजेचा धक्का बसलेल्या दोन युवतींनाही खासगी रुग्णालयात हलवावे लागल्याची घटना घडली. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये गंभीर रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता कितपत आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असली तरी केवळ डॉक्टरांवर जबाबदारी टाकली जाणार की अपुरे मनुष्यबळ, रिक्त पदे आणि कार्यान्वित न झालेल्या सुविधांचीही चौकशी होणार, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या सुविधा प्रत्यक्षात कार्यरत नसतील, तर त्याचा फायदा कोणाला, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. परिणामी, नवी मुंबईची ममटेक्नोसॅव्हीमम प्रतिमा आणि प्रत्यक्ष आरोग्य सेवा यातील तफावत आता उघडपणे समोर येऊ लागली आहे.

Exit mobile version