| चिरनेर | वार्ताहर |
जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के विकसित भूखंड जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही, असा निर्धार प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यात करण्यात आला. जेएनपीटी टाउनशिप येथील मल्टीपर्पज हॉल मध्ये झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या जाहीर मेळाव्यात हजारोंच्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. प्रा एल बी पाटील यांनी प्रथम हे स्पष्ट केले की 12.5% प्लॉट जो पर्यंत मिळत नाहीत तो पर्यंत गप्प बसायचे नाही असे जाहीर केले. किसान सभेचे नेते आणि सिडकोचे माजी अधिकारी रामचंद्र म्हात्रे यांनी सिडको कार्यालय येथे प्रकल्प ग्रस्तांची कशी फसवणूक होते ते समजावून सांगितले. तसेच तुम्ही बिल्डर कडून टोकण घेतले असेल किंवा कोर्ट कन्सर्न जरी केले असले तरी काही घाबरण्याचे कारण नाही, ते स्वतः ह्या बाबतीत मदत करायला तयार आहेत असे सांगितले.
कामगार नेते भूषण पाटील यांनी मागील 40 वर्ष सुरू असलेल्या लढ्यातील प्रमुख किस्से सांगितले. दि बा पाटील साहेब यांच्या मुळे हे 12.5% प्लॉट मिळाले आहेत हे सांगायला ते विसरले नाहीत. तसेच 111 हेक्टर मंजूर झालेले प्लॉट तातडीने मिळण्यासाठी जेएनपीटी प्रशासन भवन येथे सर्व प्रकल्प ग्रस्त दिनांक 23 मे 2023 पासून जो पर्यंत प्लॉट चा ताबा मिळत नाही तो पर्यंत आमरण उपोषणाला बसणार असे सर्वानुमते ठरवण्यात आले. प्रमुख वक्ते चंद्रशेखर प्रभू यांनी सदरहू प्लॉट विकसित करताना कशाप्रकारे शेतकर्यांनी पावले उचलायला पाहिजे जे ने करून भविष्यात सर्व पिढ्या ह्या कश्या समृद्ध राहतील याबद्दल मार्गदर्शन केले. प्रकल्प ग्रस्त शेतकर्यांना हयात शेतकरी दाखला मिळवून देण्यासाठी उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील आणि संतोष पवार यांचा सन्मान केला गेला.
प्रकल्प ग्रस्त शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश घरत यांनी वारस दाखला मिळण्यासाठी कोर्टाची किचकट प्रक्रिया रद्द करून जुनी तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात येणार्या वारस दाखल्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना केली. अनेक प्रकल्प ग्रस्त शेतकर्यांनी त्यांचे प्रश्न लेखी स्वरूपात मांडले आणि त्यांची समाधानकारक उत्तरे मान्यवरांनी दिली. पत्रकार जगदीश तांडेल यांनी सूत्रसंचालन केले आणि सुरेश म्हात्रे यांनी आभार प्रदर्शन केले.