नागरिक आणि प्रशासनाची उपाययोजनांवर चर्चा
महाड | प्रतिनिधी |
महाडमध्ये दरवर्षी येणार्या महापूर आणि जुलै2021 मध्ये आलेल्या महाप्रलयावर उपाययोजना करण्यासाठी कोकण रेल्वे, कोकण पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, राष्ट्रीय महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, जिल्हा परिषद आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी एकाच व्यासपीठावर उपस्थित राहून त्यांनी महाडकरांच्या भावना जाणून घेतल्या.
या बैठकीत महाड पूर नियंत्रण समितीच्या सुचनेनुसार कोकण रेल्वेने दासगांव येथे पुलाच्या बाजुस केलेला भरावामुळे सावित्री नदीतील पाण्याच्या प्रवाहास होणारा अडथळा दूर करण्यासाठी तात्पुरत्या उपाय योजना न करता कायम स्वरूपी उपाय योजना जानेवारी 2022 पासून सुरु कराव्यात तसेच जलसंपदा विभाग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या हद्दीतील गाळ काढण्याचे कामास सुरुवात करावी असा निर्णय घेऊन अनेक वर्षे केवळ चर्चेच्या गुन्हाळ्यात अडकलेला हा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत.
महाड पूर नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनां संदर्भात खासदार सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन महाड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील बहुउद्देशिय सभागृहात करण्यात आले होते.या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, आ भरत गोगावले, नगराध्यक्षा स्नेहल जगताप, कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय गुप्ता, श्री करंदीकर, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अभियंता घोघरे मेरीटाईन बोडाचे श्री म्हस्करे, सर्वहारा आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन त्यांचे सहकारी, महाड पूर नियंत्रण समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.
अहवालानंतर कार्यवाही
कोकण रेल्वे बोर्डाने नियुक्त केलेल्या आयआयटी संस्थेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोकण रेल्वेसह जल संपदा विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग व सार्वजनिक बांधकाम खात्याने त्यांना सुचवण्यात आलेल्या कायम स्वरूपी उपाय योजना तातडीने सुरु करण्यात याव्यात असे आदेश सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आले. या कामांसाठी असणार्या परवानग्या व राज्य सरकारकडून आवश्यक असणारा निधी पुरवण्यात येईल अशी ग्वाही खा. तटकरे यांनी दिली.
यावेळी कोकण रेल्वे बोर्डाचे व्यवस्थाकीय संचालक डॉ गुप्ता यांनी आयआयटीचा अहवाल 31 डिसेंबर पर्यत प्राप्त होईल असे सांगितले. जलसंपदा विभागामार्फत येत्या चार दिवसात नदीतील गाळ काढण्यासाठी मशिनरी येईल व कामास सुरुवात केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले.
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने भविष्यात जलसंपदा विभागाच्या हद्दीतील नदीपात्राच्या खोलीचा विचार करून आपल्या हद्दीतील गाळ उपसा करण्याबाबत निर्णय घ्यावा व केंबुर्ली ते राजेवाडी पर्यत सावित्री नदी पात्राच्या केलेल्या सर्व्हेक्षणाचा अहवाल जलसंपदा विभागाला देण्यात यावा असे सुचित करण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग विभाग,सार्वजनिक बांधकाम विभागानाही आवश्यक त्या सुचना करुन प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळच्या चर्चेत आमदार भरत गोगावले उल्का महाजन, नगराध्यक्षा स्नेहल जगताप, उल्का महाजन, पुर समिती मार्फत संजीव मेहता, नितीन पावले, व्यापारी असो चे अध्यक्ष संजय मेहता यांनी सहभाग घेतला.