योग्य लोकप्रतिनिधी निवडून दिल्यास विकास शक्य – पंडित पाटील

| रोहा | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्ष आजही जिल्ह्यातील प्रमुख पक्ष आहे. पक्षाने जनतेचा पैसा विकासकामांच्या माध्यमातून जनतेसाठीच आजवर खर्च केला आहे. पक्षाच्या माध्यमातून बिरवाडीसह चणेरा विभागात आजवर मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. मात्र, विद्यमान आमदारांचा विकासकामांकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे, हे आता येथील जनतेला कळून आले आहे. त्यामुळे योग्य प्रतिनिधी निवडून दिला तरच विकास होतो, याचा अनुभव आता चणेरासह मतदारसंघातील नागरिकांना येत आहे, असे प्रतिपादन माजी आमदार पंडित पाटील यांनी केले. चणेरा विभागातील खांबेरे ग्रामपंचायत अंतर्गत बिरवाडी येथील प्राथमिक शाळा, भवानी मंदिर सुशोभिकरण लोकार्पणप्रसंगी बिरवाडी येथे आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंडित पाटील बोलत होते. या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील, रोहा पंचायत समितीच्या सभापती गुलाब वाघमारे, उपसभापती रामचंद्र सकपाळ, जिल्हा बँक संचालक गणेश मढवी, लियाकत खोत, आपुलकी संस्थेच्या माधुरी बेंद्रे, गटशिक्षणाधिकारी साधुराम बांगारे, सरपंच गीता वारगुडे, उपसरपंच जयश्री जोशी, ग्रामपंचायत सदस्या मयुरी मोरे, शाळा समिती अध्यक्ष माधवी ओलांबे, पोलीस पाटील रवींद्र आयरे, नंदकुमार सावंत आदी उपस्थित होते.


यावेळी बोलताना पंडित पाटील यांनी योग्य नियोजन केल्याने गावाचा विकास कसा होतो हे शेतकरी कामगार पक्षाने विविध विकासकामांच्या माध्यमातून दाखवून दिल्याचे सांगितले. खांबेरे ग्रामपंचायत अंतर्गत विकासकामांसाठी दोन कोटी व चणेरा पांगळोली मार्गे रोहा रस्त्यासाठी पाच कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली असून, ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी, असा टोलादेखील लगावला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेकापचे तालुका कार्यालयीन चिटणीस जितेंद्र जोशी यांनी करताना माजी आमदार पंडित पाटील यांसह जिल्हा परिषद उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांच्या माध्यमातून खांबेरे ग्रामपंचायतीसाठी विकासकामांसाठी भरभरून निधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा जोशी यांनी केले. शेतकरी कामगार पक्ष कधीही विजयाने उन्माद होत नाही किंवा पराभवाने खचत नाही. जनतेचा पैसा जनतेसमोर आणून विकासकामे करणारा पक्ष असून, आज आमदार नसलो तरी बरीच विकासकामे मार्गी लावली आहेत. या विभागातील औद्योगिक विकासाला शेकापच कधीही विरोध नव्हता. मात्र, तुम्ही आपल्या जमिनी बाहेरील लोकांना विकू नका. – पंडित पाटील, माजी आमदार

Exit mobile version