वनक्षेत्रपाल कार्यालयाची जीर्ण अवस्था; वन भवन उभारण्याची मागणी
| पनवेल | प्रतिनिधी |
वनसंपदा, जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या पनवेल वनक्षेत्रपाल कार्यालयाची इमारत आज स्वतःच संरक्षणाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र समोर आले आहे. अनेक वर्षांपासून आवश्यक दुरुस्ती आणि सुविधांच्या अभावामुळे या कार्यालयाची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून, संरक्षण भिंती, छप्पर आणि पत्रे तुटल्याने संपूर्ण इमारत शेवटच्या घटका मोजत असल्याची भावना स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या वन सेवक कर्मचाऱ्यांना आजही मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत कार्यालयीन कामकाजावर तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पनवेल वनक्षेत्रपाल कार्यालयात कार्यरत अधिकारी व कर्मचारी सरकारी दस्तावेज जतन करून जीव मुठीत धरून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. उन्हाळा, पावसाळा किंवा कोणतेही नैसर्गिक संकट, वनक्षेत्राचे संरक्षण, वन्यजीव संवर्धन, वृक्षसंवर्धन, जंगलातील गस्त, वनाग्नी नियंत्रण, बेकायदा वृक्षतोड रोखणे, पर्यावरणविषयक जनजागृती, विविध शासकीय नोंदी आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण अशी अनेक महत्त्वाची कामे याच कार्यालयातून वन विभाग कर्मचारी करत आहेत. परंतु, या वर्षीही अतिवृष्टीमुळे कार्यालय पाण्यात बुडाले असून, भविष्यात सरकारी नोंदी गहाळ होण्याची दाट शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे निसर्गाचे रक्षण करणाऱ्या विभागालाच रक्षणाची गरज असल्याचे बोलले जात आहे. तसेच, सुरक्षित आणि सुसज्ज कार्यालय उपलब्ध नसल्याची खंत देखील स्थानिक पत्रकार व पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.
वनसंवर्धन हा केवळ एका विभागाचा विषय नसून झाड, पानं, वेली, वनस्पती यांच्या संशोधनातून भावी पिढ्यांच्या सुरक्षित भविष्याशी आणि आरोग्याशी अत्यावश्यक महत्त्वपूर्ण निगडित विषय आहे. त्यामुळे पनवेलच्या वनविभागाला सन्मानास साजेशी, सुरक्षित आणि सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे मत सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या विभागाला सुरक्षित कार्यालय कधी मिळणार? वनसंपदा जपणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूलभूत सुविधा देण्यासाठी शासनाने अजून किती काळ वाट पाहायची? शहराचा नैसर्गिक वारसा जतन करणाऱ्या या विभागासाठी आधुनिक वन भवन उभारण्याचा निर्णय आता तरी होणार का, असा प्रश्न पनवेलकर उपस्थित करत आहेत. दरम्यान, राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन पनवेल वनक्षेत्रपाल कार्यालयासाठी अत्याधुनिक, सुरक्षित आणि प्रशस्त इमारतीला मंजुरी द्यावी, अशी मागणी पत्रकार, पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून होत आहे.







