। मुरूड । प्रतिनिधी ।
पावसाळा अगदी नजीक असल्याने समुद्रातील वातावरण बदलत आहे. लाटा उसळू लागल्या आहेत. त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी 26 मेपासून मेरिटाइम बोर्ड आणि पुरातत्व खात्याकडून जंजिरा जलदुर्ग पर्यटकांना पाहण्यासाठी बंद करण्यात आला आहे. पावसाळ्यात पुरेशी काळजी घेऊन जंजिरा सुरू ठेवावा अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे.
शेवटच्या सुट्टी काळात पर्यटकांची संख्या वाढती दिसत असून अशी परिस्थिती असतानाच समुद्रात अथवा खाडीत असणारे हे जलदुर्ग पाहण्यासाठी बंद करण्यात आल्याने पर्यटकांची मात्र घोर निराश होताना दिसत आहे. जंजिरा दर्शन आता किनार्यावरून घेता येईल. खोरा जेट्टी आणि राजपूरी जेट्टीवरून जंजिर्याचे रूप बाहेरून पाहता येईल किंवा कॅमेर्यातुन टिपता येईल.
जंजिरा बंद असल्याने किल्ल्यावर पर्यटकांना नेणार्या शिडाच्या बोटी, लाँच सेवा बंद पडल्याने त्यांचा उदरनिर्वाह ठप्प झाला आहे. शिवाय संबंधित अन्य पर्यटन व्यासायिकांचे व्यवसाय देखील थंडावले आहेत. मुरुडला जंजिरा आणि पदमजलदुर्ग असे दोन जलदुर्ग असून दोन्ही पाहण्यासाठी बंद करण्यात आले आहेत. आता किनार्यावरूनच जलदुर्गाचे दर्शन घ्यावे लागणार आहे.
दरवर्षी 5 लाख पर्यटक
दरवर्षी सुमारे 5 लाख पर्यटक जंजिरा पाहण्यासाठी येत असतात. दिघी, आगरदांडा, राजपुरी, खोरा बंदर आदी जेट्टीवरून पर्यटक सिझन काळात वर्दळ सुरू असते. 350 वर्षांपूर्वी राजपुरी – दिघी खाडीत जंजिर्याचे बांधकाम झाले असून चुनखडी आणि शिसे यांच्या मिश्रणचा वापर करण्यात आला आहे, असे इतिहासावरून कळते. पावसाळ्यात म्हणजे अतिवृष्टीकाळात जंजिर्याला 20 ते 25 फूट उंचीच्या लाटा धडकताना पाहून धडकी भरते. जंजिर्याचे रौद्र रूप साहसी पर्यटकांना मात्र खूप भावते.इतकी वर्षे समुद्रातील लाटा जंजिर्याला जोरदार धडकत असल्या तरी याचे बांधकाम अद्याप अभेद्य आहे. मुरूडच्या पर्यटन विकासात जंजिर्याचे स्थान सर्वोच्च यात शंकाच नाही.