मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
वाहतूक पालीमार्गे वळवली
पाली/बेणसे | वार्ताहर |
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणार्या चाकरमान्यांना गुरुवारी (दि.9) मुंबई-गोवा महामार्गावर वाकण नाक्यावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी बहुसंख्य वाहने पालीमार्गे वळवली आहेत. यामुळे पालीत वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करणाचे काम मागील अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. महामार्गाचे काम रखडल्याने मोठ्या संख्येने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे प्रवाशी, गणेशभक्त चाकरमानी यांच्या प्रवासात विघ्न येतेय. वाहनांची वर्दळ वाढली आहे. वडखळ, पेण, नागोठणे, वाकण, माणगाव, कोलाड व इतर ठिकाणी तासन्तास वाहतूक कोंडी होतेय. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक त्रस्त झालेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस काम करीत असले तरी महामार्गाची दुरवस्था वाहनांची मोठी वर्दळ यामुळे वाहतूक कोंडी सोडविताना सार्यांची दमछाक होतेय. महामार्गावरिल वाहतूक कोंडीचे ग्रहण कधी सुटणार, असा सवाल जनतेतून उपस्थित होतोय.
महामार्गावर फौजफाटा सज्ज
जनतेचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी 15 होमगार्ड, 20 पोलीस कर्मचारी व नॅशनल हायवेचे 10 कर्मचारी, बंदोबस्तासाठी तैनात आहेत. महत्त्वाच्या नाक्यानाक्यावर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस कार्यरत आहेत. पोलीस व्हॅनची गस्तदेखील सुरू आहे.
गणेशोत्सवात मुंबई-गोवा व पाली-खोपोली महामार्गावर वर्दळ वाढली आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासन तत्परतेने काम करीत आहे. जनतेने पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.
विजय तायडे, पोलीस निरीक्षक, पाली सुधागड