। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पावसाळ्यापूर्वी खबरदारी म्हणून जून महिन्यापूर्वी आठ ते दहा तास शट डाऊन घेऊन देखील पावाळ्यात होत असलेल्या वारंवार खंडीत वीजपुरवठयामुळे संपूर्ण रायगड जिल्हा हवालदिल झाला आहे. त्यातच सातत्याने खंडीत होणार्या कनेक्टीव्हीटीमुळे आर्थिक व्यवहार देखील मोठया प्रमाणावर ठप्प होत असल्याचे चित्रामुळे संपूर्ण जिल्हाभरात तीव्र संतापाची भावना जोर धरीत आहे. मिनीटा मिनीटाला होत असलेल्या खंडीत विजपुरवठयाने विजेची उपकरणे निकामी झाली तर त्याची नुकसान भरपाई महावितरण कंपनी करणार आहे का असा संतप्त सवाल ग्राहकांमधून केला जात आहे.
मे महिन्याच्या आधीपासूनच जिल्ह्यात अनेक ठिकाणी विविध कारणांनी वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असतो. त्यात मे महिन्यापासून पावसाळयापूर्वीची खबरदारी म्हणून अनेक ठिकाणी झाडे, फांद्या यांची अडचण दुर करण्यासाठी मोठया प्रमाणावर शट डाऊन घेतला जात होता. पावसाळ्यात विजपुरवठा सुरळीत रहावा यासाठी विज ग्राहकांनी होणारी गैरसोय सहन केली. मात्र जुन महिन्यानंतर सुरु झालेल्या पावसाळ्यात पुन्हा पुन्हा खंडीत विज पुरवठयाला सामोरे जावे लागलेच. त्यानंतर आता सुरु असलेल्या जुलै महिन्यात तर खंडीत विजपुरवठयामुळे कहर केला आहे. दिवसातून आठ ते दहा तास गायब होणार्या विजपुरवठयामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळत आहे. येणारे विजेचे देयक त्याच महिन्याला वसुली करण्यासाठी तगादा लावणारे महावितरणच्या कर्मचार्यांचे मोबाईल विजपुरवठा खंडीत झाल्यानंतर बंद येत असल्याने या संतापात वाढ होताना दिसते. गेल्या आठवडयात तर मिनीटा मिनीटाला विज पुरवठा खंडीत होत असल्याने त्याचा परिणाम महागड्या विद्युत उपकरणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरणच्या या कारभारामुळे जर विद्युत उपकरणे नादुरुस्त झाली तर त्याची नुकसान भरपाई देखील महावितरणनेच द्यावी अशी संतप्त मागणी जोर धरीत आहे.