| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
आरोग्य व कुटुंबकल्याण खात्यांतर्गत आयुष्यमान भारत वैद्यकीय विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत रायगड जिल्ह्यात ४ लाख ७८ हजार १५५ पात्र लाभार्थी असून, आतापर्यंत १ लाख ९० हजार ३५५ लाभार्थांना आयुष्यमान कार्डचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करून ई-कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
सर्वसामान्यांना मोठ्या आजारांचा सामना करण्यात यावा, यासाठी आयुष्मान भारत या योजनेची सुरवात करण्यात आलेली आहे. योजनेअंतर्गत १ हजार ३५४ आजारांवर उपचार खर्च सामील आहे. कार्ड मिळालेल्या लाभार्थ्यांना योजनेत अंतर्भाव असलेल्या रुग्णालयांमध्ये पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांनी आयुष्यमान कार्ड काढले नाही त्यांनी ऑनलाइन अर्ज करून ई-कार्ड काढून घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून या योजनेतील लाभार्थांना ऑनलाइन अर्जाद्वारे कार्डचे वाटप करण्यात येत आहेत.
आयुष्मान भारत योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय १८ वर्ष किंवा त्याहून अधिक असावे, अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं नाव सामाजिक-आर्थिक जात गणना २०११ मध्ये असले पाहिजे. आता या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची पात्रता तपासावी लागेल. mera.pmjay.gov.in या वेबसाईटवर अर्ज करता येत आहे.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत अलिबाग तालुक्यातील २३ हजार ४०७ पात्र लाभार्थ्यांना कार्डचे वाटप करण्यात आले असून, कर्जत २४ हजार ३५३, खालापूर २१ हजार ८०५, महाड १४ हजार ९३८, मुरुड ६ हजार ७१०, पनवेल २० हजार ११, पेण २२ हजार २४, रोहा १४ हजार ७३६, श्रीवर्धन ८ हजार ५५०, उरण ५ हजार ५५४, तळा २ हजार ७५२, सुधागड ५ हजार ८६५, पोलादपूर ३ हजार २६३, म्हसळा ४ हजार ५६०, माणगाव ११ हजार ८२७ लाभार्थ्यांना कार्डचे वाटप करण्यात आले आहे.