| नेरळ । वार्ताहर ।
नेरळ येथील हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने सिद्धगड बलिदान दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ कवी अरुण म्हात्रे आणि आदिवासी आणि ग्रामीण भागात समाजसेवेचे कार्य करणार्या नवी मुंबई येथील श्री ट्रस्ट यांना हुतात्मा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास आ.महेंद्र थोरवे, माजी जि.प. माजी अध्यक्ष सुरेश टोकरे ,पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर,श्री साई ट्रस्टच्या संचालिका राधिका घुले, शेखर भडसावळे, रामचंद्र ब्रह्मांडे ,जयश्री मानकामे, श्रद्धा कराळे, गीतांजली देशमुख, संतोष शिंगाडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष संतोष पेरणे यांनी तर पाहुण्यांचे स्वागत तुळशीचे रोप देऊन जेष्ठ पत्रकार विजय मांडे यांनी केले.
हुतात्मा गौरव पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन आसावरी काळे यांनी केले तर सुत्रसंचलन संजय शिंदे यांनी केले.याप्रसंगी नेरळ गावातील हाजी लियाकत इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सिद्धगडाचा रणसंग्राम हे लघुनाट्य व्यासपीठावर सादर केले. तर माणगाववाडी आश्रमशाळा, नेरळ विद्या मंदिर, विद्या विकास मंदिर आणि कोतवालवाडी ट्रस्ट यांच्या विद्यार्थ्यांनी समरगीते सादर केली. तर हिंगोली जिल्ह्यातून नेरळ येथे आणलेले शाहीर प्रकाश दांडेकर यांनी पोवाडा सादर करून बलिदान दिन सोहळ्याची रंगात वाढवली.
महाराष्ट्र गीताला राज्य गाण्याचा दर्जा द्यावा.
अरुण म्हात्रे याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना अरुण म्हात्रे यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. अर्धा तासाच्या भाषणात सर्वांना पोटधरून हसायला लावले. शेवटी अरुण म्हात्रे यांनी जाहले आम्हास भाग्य हे मराठी गीत स्वतः गाऊन आणि समोरच्या संर्वांना गायला लावून जय जय महाराष्ट्र माझा हे गीत महाराष्ट्र गीताला राज्य गीताचा दर्जा देण्याची मागणी केली.