राज ठाकरेंच्या पदाधिकार्यांना कानपिचक्या
| मुंबई | प्रतिनिधी |
राज ठाकरे आंदोलन अर्धवट सोडतो, असा आरोप विरोधकांकडून केला जातो. परंतु, मनसेने टोल, भोंग्याचे आंदोलन यशस्वी करुन दाखविले. आगामी निवडणुका कोणापुढे लाचार होऊन लढू नका. त्यांना ताकदीने सामारे जा, अशा कानपिचक्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी पदाधिकार्यांना दिल्या. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित मनसे पदाधिकारी मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सत्ता हातात द्या, राज्यातील सर्व टोलनाके बंद करुन दाखवितो, अशी गर्जना करीत टोलचा पैसा राजकारण्यांच्या खिशात जातो, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
टोलमुक्त आंदोलनाबाबत मनसेबद्दल होणार्या अपप्रचाराला उत्तर द्या, अशा सूचना त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिल्या. त्याचबरोबर एकमेकांबद्दल सोशल मीडियावर टीकाटिप्पणी केल्यास, उणीदुणी काढल्यास पक्षात ठेवणार नाही, असा सज्जड इशारा राज ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला.
भाजप-शिवसेना युतीमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत सूत्र ठरलेले असताना शिवसेने आमदार कमी असताना मुख्यमंत्री पद कसे काय मागितले, असा सवाल करुन त्यावेळी तुम्ही पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना का सांगितले नाही, असे म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
दिवाळीनंतर राज्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका तडजोड, लाचार होऊन लढू नका. तुमची किंमत शून्य होऊ देऊ नका. मत मागायला येतात, त्यांना जाब विचारा. ताकदीने निवडणुकांना सामोरे जा. माझ्याकडे बाळासाहेबांचे नाव नाही, परंतु विचार आहेत. त्यांचा वारसा पुढे घेऊन जायचा आहे.
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष