रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत वरिष्ठांना सोयरसुतक नाही
पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी
स्थानिकांच्या व्यवसायावर परिणाम
। माथेरान । वार्ताहर ।
रेल्वेच्या अकार्यक्षम अधिकारी वर्गाला जर माथेरान मिनिट्रेन बाबतीत काहीएक स्वारस्य नसेल तर या मिनिट्रेनला टाटा, रिलायन्स अथवा अन्य समूहाशी करार करून खासगी पद्धतीने देण्यात यावी, अशी मागणी माथेरानकरांकडून होत आहे. त्यामुळे पर्यटकांना उत्तम प्रकारे सेवा उपलब्ध होऊन इथल्या पर्यटनात वाढ होऊन सर्वानाच चांगल्या प्रकारे रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकते, असेही त्यांचे म्हणणे आहे.
माथेरानकरांचे अर्थातच येथील लहानमोठ्या स्टॉल धारकांपासून,दुकानदार, रेस्टॉरंट चालक, सर्वसामान्य मोलमजुरी करणार्या श्रमिक वर्गासह उचचभ्रू हॉटेल इंडस्ट्री या सर्वांनाच पर्यटनावर अवलंबून राहावे लागते परंतु बहुतांश पर्यटक हे माथेरान मिनिट्रेनच्या प्रवासासाठी येत असतात. अनेक वर्षे नेरळ माथेरान दरम्यान धावणारी मिनिट्रेन सेवा बंद करण्यात आल्यामुळे पर्यटकांना नाईलाजाने खाजगी मोटार वाहनाने अथवा स्वतःच्या मोटारीने यावे लागते.
दस्तुरी नाक्याजवळील अमन लॉज रेल्वे स्टेशन पासून गावात जाण्यासाठी शटल सेवा उपलब्ध आहे परंतु त्यात सुध्दा आता तीन बोगी द्वितीय श्रेणी साठी असल्याने केवळ नव्वद प्रवाशांना लाभ घेता येतो तर एक बोगी प्रथम श्रेणी असल्याने त्यात जेमतेम दहा ते पंधरा प्रवासी प्रवास करू शकतात त्यामुळे अनेकांना या शटल सेवेचे तिकीट सुध्दा उपलब्ध होत नाही. सुट्ट्यांच्या हंगामात मोठया प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असून शटलच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत असताना या मार्गावर बोग्यांची संख्या वाढवली जात नाही.
कर्मचारी वर्गाचा पगार सुध्दा कमी बोग्यांच्या संख्येमुळे प्राप्त होत नाही. तरी देखील रेल्वेच्या वरिष्ठांना याबाबत काहीएक सोयरसुतक दिसून येत नाही.त्यामुळे नेरळ माथेरान आणि अमन लॉज ते माथेरान दरम्यान जी शटल सेवा उपलब्ध आहे या गाड्यांचे खाजगीकरण केल्याशिवाय पर्याय नाही असे स्थानिकांसह पर्यटकांमधून बोलले जात आहे. 2005 मध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वेच्या मार्गावरील अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या त्यानंतर रेल्वे मार्गाची दुरुस्ती केल्यानंतर मधल्या काळात ही सेवा सुरळीत सुरू होती त्यानंतर आजपर्यंत ही सेवा बंद करण्यात आली आहे त्यामुळे पर्यटकांची संख्या रोडावली असून याचा इथल्या पर्यटनावर विपरीत परिणाम झालेला दिसून येत आहे.नुकताच रेल्वेचे व्यवस्थापक शलभ गोयल यांनी इथे धावती भेट दिली त्यावेळी त्यांनी फक्त रेल्वे स्टेशनमध्ये दुरुस्ती त्याचप्रमाणे अन्य सोयीसुविधा करणेबाबत स्थानिकांशी चर्चा केली होती. नेरळ माथेरान या सेवेबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. आजपर्यंत करोडो रुपये या मार्गावर खर्च करण्यात आलेला आहे परंतु नेरळ माथेरान सेवा सुरू करण्याबाबत यांची मानसिकता दिसून येत नाही.
1907 साली सर आदमजी पिरभोय आणि अब्दुल हुसेन आदमजी पिरभोय या पितापुत्रांनी केवळ चार वर्षात अवघड वळणांच्या या कठीण मार्गावर स्वखर्चाने त्याकाळी सोळा लाख रुपये खर्च करून रेल्वे सुरू केली होती आणि आताचे अधिकारी वर्ग हे सर्व प्रकारच्या अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असताना हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत ही लाजिरवाणी बाब असल्याचे बोलले जात आहे.
अनेक वर्षांपासून या गावाशी एकप्रकारची नाळ जुळली गेली आहे. मिनिट्रेनचा प्रवास हाच इथे येण्याचा आमच्या कुटुंबातील सदस्यांचा एकमेव उद्देश असतो परंतु काही वर्षांपासून नेरळ माथेरान मिनिट्रेन बंद करण्यात आली आहे त्यामुळे आम्हाला नाईलाजाने खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबत लवकरच सुवर्णमध्य काढून ही सेवा पूर्वपदावर आणावी.
इंद्रजीत चॅटर्जी, पर्यटक नाशिक