गारपिटीमुळे भाताच्या पीकाची नासाडी
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यात अवकाळी पाऊस सुरू असून गारपीट पावसामुळे दुबार भाताची शेती संकटात सापडली आहे. राजनाला कालवा तसेच पाझर तलाव आणि लघुपाटबंधारे प्रकल्प या ठिकाणी केली जाणारी दुबार शेती भाताची शेत पाण्याने भरल्याने शेतकर्यांची शेती खराब झाली आहे. दरम्यान, त्यानंतर भाताच्या शेतीचे नुकसान झाल्याने तब्बल 30 गावातील भाताच्या पिकाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, या शेतीचे होत असलेले नुकसान यांचे पंचनामे करावेत आणि शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी प्रगत शेतकरी दशरथ मूने यांनी केली आहे.
गेली पाच दिवस कर्जत तालुक्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यात सर्वात मोठे नुकसान कर्जत तालुक्यात दुबार भातशेती करणार्या शेतकर्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात राजनाला कालवा भागातील 40 गावातील शेतकरी भाताची शेती करतात. तर तालुक्यातील अवसरे आणि पाषाने येथील लघुपाटबंधारे प्रकल्प आणि खांडस, खांडपे, कशेले, साळोख, सोलनपाडा, डोंगर पाडा येथील पाझर तलाव यांच्या पाण्यावर भाताची शेती काही भागात शेतकरी करीत असतात. दुबार शेती ही हक्काची आणि खात्रीची असल्याने शेतकरी भाताची शेती करीत असतात. मात्र, यावर्षी अवकाळी पावसाने भाताच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
भाताची शेती करणारे शेतकरी हे साधारण मे महिन्यात भाताची कापणी करीत असतात. यावर्षी मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यात अवकाळी पाऊस आला आणि तो अवकाळी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. अनेक शेतात उभे असलेले भाताचे पीक तसेच काही ठिकाणी शेतकर्यांनी मजूर घेवून केलेले भाताची कापणी केली होती. ते सर्व भाताचे पीक शेतात पाणी साचल्याने भिजून गेले आहे. तर वादळी वार्यासह आलेल्या पावसामुळे भाताचे शेतात उभे असलेले पीक हे कोलमडून गेले आहे.
शेतकर्यांनी आपल्या या भावना कर्जत तालुका आणि रायगड जिल्ह्यातील कृषी अधिकारी यांच्यापर्यंत पोहचवल्या आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सभापती पुंडलिक पाटील यांच्यासह शिवसेना कृषी सेलचे तालुका अध्यक्ष दशरथ मुणे यांनी शासनाला पत्र देवून तत्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कृषी विभागाने देखील तातडीने भाताचे नुकसान झालेल्या दुबार शेती असलेल्या भागाची पाहणी केली आहे. तसेच, उपविभागीय कृषि अधिकारी खोपोली नितीन फुलसुंदर, तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळी आणि अन्य कृषी पर्यवेक्षक तसेच कृषी सहायक यांनी तालुक्यातील विविध भागात फिरून भाताच्या शेतीची पाहणी केली आहे. दुबार भातशेती करणार्या शेतकर्यांच्या साधारण 50 हेक्टर जमिनीवरील भाताचे पिकाची नासाडी झाली असून कर्जत तालुक्यातील शेतकरी अवकाळी तसेच गारपीटमुळे भाताचे पीक नुकसान ग्रस्त झाले आहे.