भरतीकाळात पाणी तुंबू नये यासाठी नियोजन
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग पालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. पुढील काही दिवसात ती पूर्ण होतील, असा विश्वास मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी व्यक्त केला आहे. समुद्र सपाटीलगत असल्याने अलिबाग शहरात नालेसफाईकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते. अन्यथा पाणथळ जागेत पाणी तुंबण्याची शक्यता आहे. मुसळधार पाऊस आणि त्याचवेळी समुद्राला भरती असेल तर अलिबाग एसटी आगार परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्याचबरोबर रामनाथ परिसर, तळकरनगर, पीएनपी नगर, कोळीवाडा या परिसराला सर्वाधिक फटका बसतो. ही परिस्थिती उद्भवू नये म्हणून परिसरातील नालेसफाई चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न अलिबाग नगरपालिकेकडून होत आहे. अलिबाग एसटी बस आगाराच्या बाजूने जाणाऱ्या नाल्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा साचल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. यामुळे पीएनपी नगर येथील पाण्याचा निचरा होण्यास अढथळा निर्माण होतो. हा नाला पुढे डम्पिंग ग्राऊंड येथील खाडीला जाऊन मिळतो. अलिबाग कोळीवाडा, मेटपाडा, श्रीबाग परिसरात पाणी तुंबून राहू नये यासाठी अलिबाग नगरपालिकेने नियोजन केले आहे.
अलिबाग शहर हे समुद्र सपाटीलगत असल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे नगरपालिकेला नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करावी लागतात. या वर्षी नालेसफाईच्या कामांचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यात आले असून आतापर्यंत 60 टक्के कामे पूर्ण झाली आहेत.
अंगाई साळुंखे,
मुख्याधिकारी, अलिबाग नगरपालिका.