हजारो सापांचा रस्त्यावर चिरडून हकनाक बळी
| पाली/बेणसे | वार्ताहर |
पावसाळा नुकताच संपला आहे. या हंगामात साप, सरडे इत्यादी सरपटणारे प्राणी भक्ष्य व उष्णतेसाठी रस्त्यावर बाहेर फिरतात. परिणामी, हे प्राणी रस्त्यावर येऊन वाहनांखाली चिरडून त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त केली जात आहे. साधारणतः दिवड, धामण, नानेटी, घोणस, तस्कर, मांजर्या, नाग, मण्यार इत्यादी व काही दुर्मिळ सापांचा रस्त्यावर चिरडून अधिक प्रमाणात मृत्यू होत आहे. शेतकर्यांसाठी सुद्धा हे प्राणी अधिक महत्त्वाचे आहेत. विशेषतः साप तर शेतकर्यांचा मित्रच आहे. हे सर्व सरपटणारे प्राणी आपल्या पर्यावरणाचे आणि संबंधित परिसंस्था अबाधित ठेवण्याचे काम करतात. अन्नजाळी आणि अन्नसाखळीत या प्रत्येक प्राण्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. रायगड जिल्हा हा निसर्ग सौंदर्याने नटलेला असून, येथे विविध प्रकारची जैवविविधता आढळते. येथील बहुतांश रस्ते हे जंगलातूनच जातात. साप, सरडे, बेडूक यांच्या प्रजननाचा हंगाम असल्याने या प्राण्यांची हालचाल वाढत आहेत. प्रामुख्याने रात्रीच्या व पहाटेच्या वेळी अधिक हालचाली असतात. तसेच खाद्य मिळविण्यासाठीही त्यांना फिरावे लागते. दरम्यान, हे प्राणी रस्त्यावर येतात आणि वाहनांखाली चिरडून मरतात. जर वाहनचालकांनी योग्य सावधानता बाळगत सुरक्षितपणे वाहन चालविल्यास या प्राण्यांचा जीव वाचू शकतो, असे मत अनेक पर्यावरणप्रेमींनी मांडले आहे.
वाहने चालवा जपून
पर्यावरणाचे संतुलन राखण्यास साप, बेडूक व सरडे या प्राण्यांचे खूप मोठे योगदान आहे. या हंगामात वाहनांखाली चिरडून अनेक साप व सरड्यांचा मृत्यू ओढावतो. त्यामुळे या कालावधीत वाहनचालकांनी खबरदारी घेऊन अधिक दक्ष राहून वाहन चालविणे गरजेचे आहे. याबाबत अधिक जनजागृती होणे आवश्यक आहे, असे आवाहन निसर्गप्रेमी संस्थांनी केले आहे.
- सरपटणारे प्राणी पर्यावरणासाठी अधिक मौलिक आहेत. आपल्या घरात, लोकवस्तीत किंवा औद्योगिक क्षेत्रात कोणताही साप आढळल्यास घाबरुन न जाता त्याला दुखापत न करता जवळील सर्प मित्रास बोलावणे आवश्यक आहे. – तुषार केळकर, सर्पमित्र