आदिवासींना मिळतोय हक्काचा रोजगार
| सुधागड-पाली | वार्ताहर |
जंगल व डोंगर रांगांनी वेढलेल्या रायगड जिल्ह्यात सध्या आरोग्यदायी विविध कंदमुळांचा हंगाम सुरू झाला असून, त्यांचे भरघोस उत्पादन मिळत आहे. जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठेत कणक, करंदे, चाई, आळू, वरा, लोंढी व रताळी आदी कंदमुळांची विक्री करुन आदिवासी बांधव आपल्या पोटाची खळगी भरत आहेत. चार पैसे जवळ राहात असल्याने आदिवासींना यातून हक्काचा रोजगारदेखील मिळत आहे.
जिल्ह्यातील आदिवासीवाड्यांवर त्यामध्ये बहुतांश ठाकूरवाड्यांवर घराशेजारील परसबागेत, माळरानावर व डोंगरावर कंदमुळांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले गेले आहे. मागील वर्षी 40 ते 50 रुपये किलोने मिळणारे कणक, करंदे, चाई, वारा, आळू, लोंढी, रताळी आदी कंदमुळे यंदा 60 ते 70 रुपये किलोने मिळत आहेत, असे करंजघर येथील कंदमुळे उत्पादक व विक्रेती लक्ष्मी लेंडी यांनी सांगितले. तर माणगाव येथील मनीष पाटील म्हणाले की, या हंगामात मिळणारे हे विविध आरोग्यवर्धक कंदमुळे आवर्जून खातो. शिवाय, मुंबई-पुणे आदी शहरात राहणार्या नातेवाईकांना भेट म्हणूनदेखील अनेकजण देतात. शहरात ही कंदमुळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसल्याने महाग मिळतात. त्यामुळे येथून शहरात विक्रीसाठी नेली जातात.
आरोग्यवर्धक व चविष्ट
कंदमुळे साधारण चवीला गोड व रुचकर असतात. या कंदमुळांचे आयुर्वेदिक उपयोगही आहेत. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. शरीरात रक्ताची वाढ होते. शरीरातील कार्यशक्ती वाढते. विविध व्हिटॅमिन्स व कर्बोदके असतात. शरीराला ऊर्जा मिळते. अशा विविध दृष्टीने ही कंदमुळे गुणकारी आहेत. बहुतांश जण ही कंदमुळे उकडून तर काही जण भाजून खातात. तर काहीजण याची भाजीदेखील बनवून खातात. मुंबई, पुणे आदी शहरांतील लोक आवर्जून कंदमुळे येथून नेतात.
जिल्ह्यातील आदिवासी बांधव आपल्या घराशेजारी व डोंगरावर कंदमुळे लावतात. या कंदमुळे विक्रीतून आदिवासींना हक्काचा रोजगार मिळतो. परिणामी, त्यांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात थांबते.
राजू बांगारे
शिक्षक, चेरफळवाडी, सुधागड