लाईफलाईन बिघडण्याची शक्यता
एका कर्मचार्याला आली भोवळ
| रसायनी | वार्ताहर |
जुनी पेन्शन व अन्य मागण्यांबाबत सरकारी व निमसरकारी कर्मचारी यांनी पुकारलेला संप सलग पाचव्या दिवशी सुरु असल्याने सरकारचा करोडो रुपयांचा महसूल बुडाला आहे. त्यातच गावापासून ते शहरापर्यंतची लाईफलाईन बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हाचा चटका बसल्याने खालापूर पंचायत समितीचे कार्यालयीन अधिक्षक संजीव चोपडे यांना चक्कर आली.
सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी आपल्या अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या 18 मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला असून, त्याचा आजचा पाचवा दिवस आहे. राज्यांतील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संघाच्या वतीने मोर्चा काढून धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या संपामुळे सरकारचा करोडो रुपयांचा महसूल बुडाला आहे. अनेकांनी स्थावर मालमत्ता खरेदी करणे, नवीन घर खरेदी करणे, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीचे स्वप्न भंगले आहे. याचा फटका सरकारला बसला आहे.
31 मार्चनंतर नवीन स्थावर जंगम मालमत्ता यांचे मूल्यांकन यात वाढ होते. हे मूल्यांकन 1 एप्रिलपासून वाढत असल्याने अनेकजण 31 मार्चपूर्वी खरेदी व्यवहार करतात, त्यामुळे शासनाला करोडो रुपयांचा महसूल मिळतो. संपामुळे हे नुकसान झाले आहे. शिवाय, सर्वच कार्यालय बंद असल्याने शासकीय योजनांना कोर्ट फिस लागणे, मुद्रांक पेपरची विक्री बंद असल्याने तोही महसूल बुडाला आहे. तर, 31 मार्च पूर्वी बिले खर्चिक पडणे, नवीन कामांच्या निविदा सूचना प्रसिध्द करणे, महसूलबरोबर ग्रामपंचायत विभागाची करवसुली झाली नाहीतर कर्मचार्यांना पगार मिळणे शक्यच नाही.
महसूल प्रशासनाने तलाठी, मंडळ अधिकारी यांना वसुलीचे उद्दिष्ट दिलेले आहेत. दिलेले उद्दिष्ट साध्य न होणे, परिणामी सरकारी तिजोरी रिकामी होणे, महसूल विभाग संपावर असल्याने दगड, माती, बिनशेती, दंड यांचे स्वामित्व धन भरता येत नाही, त्यामुळे वाळू, मातीचोरीचे प्रमाण वाढले आहे. तर, खदान व वीटभट्टी येथून जाणारी दगड, माती यांचे मोजमाप यावर नियंत्रण बसत नसल्याने तेही स्वामित्व धन बुडत आहे. ग्रामसेवक यांच्याबरोबर ग्रामपंचायत कर्मचारी संपावर असल्याने गावच्या विकासाची, आरोग्याची, पाणीपुरवठा, स्वच्छता यांची लाईफ लाईन बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
येत्या काळात ग्रामपंचायत निवडणुका होण्याची शक्यता असून, त्यांचेही निवडणुकीचे काम स्तब्ध आहे. दिव्यांग, अपंग, वयोवृद्ध, निराधार योजना यांच्या लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे. अवकाळी पावसामुळे नुकसानीचे पंचनामे मिळणे कठीण झाले आहे. शासकीय योजनांसाठी लागणारी कागदपत्रे मिळणे कठीण झाले आहे. शिक्षक संपात असल्याने विद्यार्थी, पालक यांच्यात चिंता निर्माण झाली आहे.
राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना सरचिटणीस अमोल बोराटे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कदम, भूमी अभिलेख विभागचे देवेंद्र मांजरेकर, शिक्षक सेनेचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, कृषी विभाग निलेश पाटील, वन विभाग अजित फराटे, शिक्षक संघाचे संतोष पाटील, विनोद कडव, मस्तान बोरजे, श्रीधर शेंडे यांच्यासह अनेक कर्मचारी या मोर्चात सामील झाले आहेत.आज खालापूर पंचायत समितीच्या परिसरात घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे. अनेक स्फूर्तीदायक गीतांनी संपकर्यांमध्से नवचैतन्य निर्माण झाले होते.






