। रोहा । वार्ताहर ।
उन्हाळी रब्बी हंगामाच्या पिकाला अवकाळी पावसाने झोडपले. त्यामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे त्याचे नुकसान होताना दिसत आहे. शेतकरी बळीराजा अधिक संकटात सापडला जात आहे. मागील काळात आधी कोरोना मग चक्रीवादळ, तौक्ते वादळ त्यामुळे काही ना काही संकटे बळीराजाच्या मागे कायम आहेतच त्यातुनच शेतकरी सावरतो ना सावरतो तोच पुन्हा या वर्षीच्या उन्हाळी भात पिकाला अवकाळी पावसाच्या रूपातून तडाखा पुन्हा बसत असल्याने आता बळीराजा चिंतेत पडला आहे.
गेली दोन तीन दिवस तालुक्यातील कोलाड, खांब, वरसगावसह काही भागात वादळ वार्यासह तुफान पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाची अधिक चिंता वाढवत बळीराजा संकटात सापडला आहे. रोहा तालुक्यातील कोलाड-खांब, तिसे परिसरातील शेतकर्यांचे या तुफान पडलेल्या अवकाळी पावसामुळे कापून ठेवलेल्या भातशेतीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरांच्या वैरणीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या भातशेतीचे त्वरीत पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
तालुक्यातील कोलाड, महादेववाडी, हेटवणे, वरसगाव, चिंचवली, तिसे, पुई, गोवे, मूठवली, शिरवली, पुगांव, खांब, नडवली या परिसरातील शेतकरी कुंडलिकेच्या डोळवहाल चिंचनातून व कोलाड पाटबंधारे विभागाच्या कालव्याच्या पाण्यावर दुबार भात शेतीचे पीक घेतले जाते. तर पिकवली जाणार्या भातशेतीचे गेली दोन दिवस दुपारनंतर पडलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. या परिसरातील भातशेती ही कोलाड पाटबंधारे विभाग यांच्या मार्फत सोडण्यात येणार्या कालव्याच्या पाण्यावर केली जाते. ते पीक देखील चांगले आले. त्याची कापणी बांधणी मळणीचे काम शेतकरी यांच्याकडून सुरू आहे. मात्र अवकाळी होत असलेल्या पावसामुळे मोठे नुकसान होत असताना दिसत आहे.
गेली काही दिवस उष्णतेचा पारा 42 अंशाहुन अधिक असल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. त्यात सोमवारी, मंगळवार, बुधवारीदेखील पावसाने हुकूमत गाजवत गुरूवारीदेखील आभाळ वातावरण ढगाळ असल्याचे दिसून येत होते. पुन्हा अचानक वादळी वार्यासह रोहा तालुक्यातील कोलाड आणि परिसरात खांब, कोलाड, वरसगाव, तिसे, तळवली परीसरात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा देत पर्जन्यवृष्टी केली तसेच मुंबई गोवा मार्गालगतच्या गाव हद्दीत जोरदार पाऊस झाला असल्याने उन्हाळी भात पीक तसेच आंबे, काजू फळबगा तसेच रानमेव्याचे मोठे नुकसान झाले आहे.
येथील कालव्याच्या पाण्यावर केली जाणारी भातपीके उत्तम प्रकारे आली.पावासाला सुरु होण्यास पंधरा ते वीस दिवस शिल्लक असल्यामुळे या विभागातील शेतकर्यांनी भातशेतीची कापणी, बांधणी केली केली. परंतु अवकाळी आलेल्या तौक्ते चक्रीवादळ व तुफान झालेला पाऊस यामुळे कापून बांधून ठेवलेल्या भातपीकात पाणीच पाणी साचल्याने भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. याबरोबर पावसाला हंगामात चार महिने पुरणारी गुरांची वैरण अथवा चारा भिजल्यामुळे गुरांच्या वैरणीचा प्रश्नही बळीराजा समोर गंभीर बनला आहे .