उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक
| पाली /बेणसे | प्रतिनिधी |
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात अवजड आणि ओव्हरलोड डंपरचा थरार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सोमवारी (दि. 13) रात्री एका बेभान डंपरने येथील आगरआळी जवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक देऊन उडवले. सुदैवाने, या अपघाताच्या वेळी दुचाकींजवळ कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
या अपघातात दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. पाली शहरात गेल्या काही महिन्यांपासून डंपरमुळे होणाऱ्या अपघातांचे सत्र सुरूच आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात महावितरणचे कर्मचारी अनंत सोनवणे यांना एका भरधाव डंपरने पाठीमागून धडक दिली होती. सोनवणे यांनी प्रसंगावधान राखून गाडीवरून उडी मारल्याने त्यांचे प्राण वाचले, मात्र त्यांच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली होती. तसेच जानेवारी महिन्यात ग. बा. वडेर हायस्कूल जवळ एका डंपरच्या फाळक्याची कडी तुटून ग्रामविकास अधिकारी सचिन केंद्रे गंभीर जखमी झाले होते. दीड-दोन महिन्यांच्या अंतराने लागोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे प्रशासनाने यातून कोणताही धडा घेतला नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पालीतील नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात प्रचंड असंतोष आहे. त्याबरोबरच या ओव्हरलोड डंपर मधून नेण्यात येणारी खडी बऱ्याचदा रस्त्यावर पडलेली असते. त्यामुळे पादचाऱ्यांना त्रास होतो. दुचाकीस्वार घसरून पडतात. मागील आठवड्यात येथील ग. बा. वडेर हायस्कूलच्या रस्त्यावर अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात खडी पडली होती.
नगरपंचायतीचा ठराव धूळ खात?
नागरिकांच्या तक्रारीनंतर पाली नगरपंचायतीने 26 फेब्रुवारी रोजी ठराव क्र. 197 मंजूर केला होता. यानुसार शहरातून सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत अवजड वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात 27 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन कार्यवाहीची मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणत्याही सूचना प्राप्त न झाल्याने किंवा नगरपंचायतीने अंमलबजावणी न केल्याने हा ठराव केवळ कागदावरच राहिला असल्याचे श्रीकांत ठोंबरे यांनी सांगितले.
बाह्यवळण मार्ग (बायपास) कधी होणार?
पाली शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी 'बायपास' मार्ग हा एकमेव कायमस्वरूपी पर्याय आहे. दुर्दैवाने, गेल्या १२-१५ वर्षांपासून हा मार्ग मंजूर होऊनही रखडला आहे. जोपर्यंत हा मार्ग पूर्ण होत नाही आणि ओव्हरलोड वाहतुकीवर कडक निर्बंध येत नाहीत, तोपर्यंत नागरिकांचा जीव असाच टांगणीला राहणार आहे.
या ओव्हरलोड डंपर वाहतुकीमुळे शाळकरी विद्यार्थी, पालक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. अवजड वाहतूक थांबावी व निर्बंध लागावे यासाठी नगरपंचायतीला सह्यांचे निवेदन दिले होते, मात्र कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनाने ही ओव्हरलोड वाहतूक तातडीने बंद करावी, अन्यथा सामान्य पालीकर रस्त्यावर उतरतील.
श्रीकांत ठोंबरे,
अध्यक्ष, भाजप, सुधागड तालुका
नगरपंचायतीने सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत अवजड वाहतूक शहरातून पूर्णपणे बंद करण्याचा ठराव (क्र. 197) संमत केला आहे. या संदर्भात 27फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी महोदय यांना पत्र देऊन कार्यवाहीची मागणीही करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी महोदय यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर, प्रशासनाच्या वतीने अवजड वाहतूक बंदीबाबतचे पुढील अधिकृत आदेश निर्गमित केले जातील.
सुलतान बेनसेकर,
उपनगराध्यक्ष, नगरपंचायत पाली
