रस्त्यांच्या कामांमुळे धुळीचे लोट

पाचाडमधील ग्रामस्थांचे आरोग्य बिघडले

| महाड | वार्ताहर |

महाड तालुक्यात सुरू असलेल्या विविध रस्त्यांच्या कामामुळे धुळीचा त्रास रस्त्याकडेला असलेल्या घरांना आणि नागरिकांना होत आहे. या रस्त्यांच्या कामांमध्ये पाण्याचा शिडकावा केला जात नसल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडून नागरिकांचे आरोग्यदेखील बिघडले आहे. याकडे महामार्ग बांधकाम विभाग मात्र सपशेल दुर्लक्ष करत आहे.

महाड तालुक्यामध्ये सध्या विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामध्ये महाड रायगड मार्ग, म्हाप्रळ पंढरपूर, मुंबई-गोवा महामार्ग, त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी रस्ते आणि मोऱ्यांची कामे सुरू आहे. रस्त्यांची ही कामे गेली दोन वर्षांहून अधिक काळ सुरू असल्याने नागरिकदेखील त्रस्त झाले आहेत. महाड-रायगड हा मार्गदेखील गेली दोन वर्षांहून अधिक काळ सुरूच आहे. अनियोजित कामामुळे ही कामे रखडलेली आहेत. ठेकेदार काम पूर्ण करण्याच्या घिसाड घाईमध्ये किती दिवसात किती काम पूर्ण होईल याकडे न पाहता संपूर्ण रस्त्याचे खोदकाम करून टाकत आहे. खोदलेल्या रस्ता तसाच ठेवून अन्य ठिकाणी कामे केली जात असल्याने ज्या ठिकाणी खोदकाम आणि भराव केला जात आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य तयार होत आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे टाकलेल्या मातीचा भुगा होऊन ही माती हवेबरोबर नागरिकांच्या घरांमध्ये आणि तोंडावाटे शरीरात शिरकाव करत आहे. यामुळे शेकडो नागरिक शासनाच्या विकाराने त्रस्त झाले आहेत.

महाड तालुक्यात सुरू असलेल्या महाड रायगड मार्गावरील कोंझर ते किल्ले रायगड, राजमाता जिजाऊ माँसाहेब समाधी आणि पाचाड, नाते खिंड ते तेटघर या दरम्यान रस्त्यासाठी खोदकाम करून भराव करण्यात आला आहे. या मार्गावर पाणी शिंपले जात नसल्याने धुळीचे लोट उठत आहेत. अशीच स्थिती म्हाप्रळ-पंढरपूर मार्गावर देखील आहे. या धुळीनेदेखील नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, नागरिकांच्या आरोग्याबाबत संबंधित अधिकारी मात्र दुर्लक्ष करून आहेत. या धुळीमुळे रस्त्या शेजारी असलेल्या घरांमधील नागरिकांना श्वसनाचे विकार जडले आहेत. रस्त्यावर पाणी मारा असे सांगूनदेखील ठेकेदार लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. या धुळीमुळे रस्त्याकडेला असलेले छोटे लघु व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते आणि हॉटेलचालक देखील त्रस्त झाले आहेत.

Exit mobile version