महाराष्ट्रासह कर्नाटक, गोव्यात मागणीत वाढ
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात सध्या सुका जवळा अर्थात सुकटीचा हंगाम जोरात सुरू असून, बाजारपेठांमध्ये सुकटीला मोठी मागणी निर्माण झाली आहे. पावसाळ्यात मासेमारी बंद राहणार असल्याने सुकी मासळी खरेदी करून साठवून ठेवण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. स्थानिक बाजारपेठेसह महाराष्ट्रातील विविध जिल्हे तसेच कर्नाटक आणि गोवा राज्यांत सुक्या जवळ्याला मोठी मागणी असून, आतापर्यंत सुमारे तीन हजार टन सुक्या जवळ्याची निर्यात झाल्याची माहिती समोर आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळ्याला चांगला दर मिळाल्याने मच्छिमारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने जूनपासून दोन महिन्यांसाठी मासेमारी बंद राहणार आहे. त्यामुळे मासळीप्रेमींना ताजी मासळी मिळणे कठीण होणार असून, पावसाळ्यापूर्वी सुकी मासळी खरेदी करण्यावर भर दिला जात आहे. वाकटी, बोंबील यांसह सुका जवळा मोठ्या प्रमाणात विकत घेऊन त्याची साठवण केली जात आहे. मार्च महिन्यापासून सुका जवळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. जाळ्यात मोठ्या प्रमाणात जवळा सापडल्याने मच्छिमारांना यंदा चांगला फायदा झाला आहे. पकडलेला जवळा सुकवून, स्वच्छ करून बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात येत आहे. स्थानिक बाजारपेठेबरोबरच राज्यातील विविध जिल्हे आणि बाहेरील राज्यांमध्येही जवळ्याची मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यात आली आहे.
गतवर्षी दहा किलो जवळ्यामागे 730 ते 800 रुपये दर मिळत होता. मात्र, यंदा दहा किलो जवळ्यासाठी दीड हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत दर मिळाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघाचे माजी अध्यक्ष विजय गिदी यांनी दिली. रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि मुरूड तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात जवळ्याची निर्यात झाली आहे.
यंदा रायगडसह कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर या जिल्ह्यांमध्ये तसेच कर्नाटक आणि गोवा राज्यात सुक्या जवळ्याची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. आतापर्यंत सुमारे तीन हजार टन जवळा विविध बाजारपेठांमध्ये पाठवण्यात आला असून, त्यामुळे मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा झाल्याचे सांगितले जात आहे.
शेकडो हातांना रोजगार
ओला जवळा बोटीतून उतरवणे, तो सिमेंट काँक्रीटच्या खळ्यांमध्ये सुकण्यासाठी पसरवणे, त्यानंतर त्याची स्वच्छता करणे तसेच सुका झालेला जवळा भरून ठेवणे अशी विविध कामे गेल्या महिनाभरापासून सुरू आहेत. या कामांमुळे परिसरातील अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. दररोज 500 ते 700 रुपये मजुरीवर हे काम दिले जात आहे. काही ठिकाणी दहा ते पंधरा तर काही ठिकाणी पाच ते सात महिला या प्रक्रियेत कार्यरत आहेत. त्यामुळे दोन ते तीन महिन्यांच्या हंगामात शेकडो हातांना रोजगार मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शेणाच्या खळ्यांची जागा सिमेंट काँक्रिटने घेतली
पूर्वी मार्च महिन्यात जवळा सुकवण्यासाठी शेण आणि माती वापरून पारंपरिक खळ्या तयार केल्या जात होत्या. जमीन सपाट करणे, शेण-माती आणणे आणि खळी तयार करण्यासाठी मोठा खर्च करावा लागत होता. मात्र, हा खर्च टाळण्यासाठी आता सिमेंट काँक्रीटच्या खळ्यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे पारंपरिक शेणाच्या खळ्या आता कालबाह्य होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मच्छिमारांना आर्थिक मदत करा
जून महिन्यापासून दोन महिन्यांसाठी मासेमारीवर बंदी लागू होणार आहे. या कालावधीत हजारो मासेमारी बोटी किनाऱ्यावरच उभ्या राहतील. त्यामुळे मच्छिमारांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. रोजगाराचे साधन बंद राहिल्याने आर्थिक अडचणी निर्माण होणार असल्याने सरकारने प्रत्येक मच्छिमार कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी 10 ते 20 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघाचे माजी अध्यक्ष विजय गिदी यांनी केली आहे.
यंदा मोठ्या प्रमाणात जवळा जाळ्यात सापडला. गतवर्षीपेक्षा यंदा जवळ्याला चांगला दर मिळाला आहे. काही ठिकाणी सुका जवळा 100 ते 200 रुपये किलो दराने विकला गेला. रायगडसह कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच कर्नाटक आणि गोवा राज्यात सुमारे तीन हजार टन जवळ्याची निर्यात झाली आहे.
विजय गिदी,
माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघ, मुंबई






