जेएनपीटी महामार्गावर धुळीचे साम्राज्य

महामार्गावर लहान खडीच्या प्रमाणात वाढ

| उरण | वार्ताहर |

कळंबोली डी पॉईंट ते जेएनपीटी महामार्गावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणार्यांना श्‍वसनाच्या आजाराला आमंत्रण दिले जात आहे. त्याचबरोबर महामार्गावर लहान खडी जमा झाल्याने दुचाकी वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरुन गाडी चालवावी लागत आहे. एखाद्याचा जीव गेल्यावर जागे होणार का, असा सवाल वाहन चालकाकडून केला जात आहे.

कळंबोली एमजीएम रुग्णालयापासून जेएनपीटी महामार्गाला सुरुवात होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्‍वभूमीवर तेसेच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यामातून आठ लेन असलेला महमार्ग बांधण्यात आला आहे. गोवा, पुणे, जेएनपीटी जाण्यासाठी या मार्गाचा अवलंब केला जातो. 2016 साली बांधण्यात आलेल्या महामार्गकडे प्राधिकरणाकडून दुर्लक्ष केल्याने महामार्गावर लहान खडी, धुळीचे साम्राज्य पसरले आहे.

जेएनपीटी बंदरातून मोठ्या प्रमाणात मालाची वाहतूक केली जाते. या ठिकाणी चार टर्मिनस आहेत. तेथून मालाची निर्यात आयात केली जाते. वर्षाला येथे लाखो कंटेनर हाताळले जातात. त्यामुळे कळंबोली ते जेएनपीटी दरम्यान अवजड वाहतूक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भरधाव वेगाने धावणार्‍या वाहतुकीमुळे अपघाताच्या समस्येने डोके वर काढले आहे. त्यात आता धुळीचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महामार्गावर शेजारी असणार्‍या कंटेनर यार्डमुळे यार्डात असणारी धूळ महामार्गावर येत आहे. त्यासोबत लहान खडी रस्त्यावर येत आहे. ही धूळ व खडी दोन कि.मी. पर्यंत पसरते आहे. ठिकठिकाणी फलक नसल्याने वाहनचालकांना दिशाभूल होत आहे. अपघात प्रवण असलेल्या ठिकाणी कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्याता वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version