चालक, पादचा-यांची कसरत
। सुकेळी ।वार्ताहर ।
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यामुळे मुंबई -गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दुचाकीस्वार व पायी चालत जाणा-यांना मोठ्या प्रमाणात या धुळीचा सामना करावा लागत आहे.
यावर्षीदेखील महामार्गाची अवस्था अंत्यंत बिकट झाली असुन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच महामार्गावर महाभयंकर खड्डयांचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे या पडलेल्या खड्ड्यांमध्ये संबंधित ठेकेदाराकडून स्वतः:च्या फायद्यासाठी निकृष्ट दर्जाची खडी व माती वापरुन खड्डे भरण्यात आले, परंतु मध्यंतरी पडलेल्या जोरदार पावसामुळे व अतिवेगाने जाणा-या वाहनांमुळे या खड्डयांमधील खडी व माती रस्त्यावर आजुबाजुला पसरली आहे. गेले दोन ते तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे महामार्गावरील नागोठणे ते कोलाड दरम्यानच्या रस्त्यावर धुळीचे लोटच्या लोट दिसत आहेत.
दुचाकी स्वरांना या धुळीचा मोठ्या प्रमाणांवर त्रास होत आहे. त्यामुळे पाऊस नसतांना देखिल दुचाकीस्वारांना रेनकोटचा वापर करावा लागत आहे. तसेच रस्त्यावर पडलेली मोठमोठी खडी रस्त्यावरुन चालत जाणा-या येणा-यांना लागुन अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच रस्त्यावरुन अतिवेगाने जाणा-या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात धुळ उडाल्यामुळे दुचाकीस्वारांना व पायी चालणा-यांना समोरचे काहीच दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी संबंधित कंपनीने व ठेकेदाराने याबाबतीत योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांतुन होत आहे.