। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
महसूल विभागाने पीक पाहणीसाठी ई-पीक पाहणी या स्वतंत्र मोबाइल अॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. जिल्ह्यात 15 ऑगस्टपासून ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शेतकरी ई-पीक पाहणी पव्दारे त्यांच्या पिकांची नोंदणी करू शकतील. यामुळे पिकांचे जिल्ह्यातील अचूक क्षेत्र कळणार आहे. त्यामुळे आर्थिक पाहणी आणि कृषी नियोजन करणे शक्य होणार आहे. तरी महसूल विभाग आणि कृषी विभाग यांनी समन्वयाने ई-पीक पाहणी हा महत्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी करावा असे, आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी दिले.
ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, विभागीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय सनियंत्रण समित्या गठित करण्यात आल्या आहेत. शेतजमिनीच्या उतार्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकर्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकर्यांना पीक कर्जही दिले जाते. त्यामुळे ही पीक पाहणी पध्दत अधिक अचुक व सोपी होण्यासाठी टाटा ट्रस्टच्या सहयोगाने हा प्रकल्प राज्यभर राबविण्यात येत आहे. पीक पाहणी नोंदणीमध्ये शेतकर्यांचा सहभाग वाढवल्यामुळे पीक विमा आणि पीक पाहणीचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल. शेतकर्यांना पीककर्ज मिळण्यातही यामुळे सुलभता येईल. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि मदत देणेही शक्य होईल.