बारावीची 11 फेब्रुवारी, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून
| रायगड | खास प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.12 वी) दि. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.10 वी) 21 फेब्रुवारी ते 17 मार्च कालावधीत पार पडणार आहे. रायगड जिल्ह्यात 31 हजार 817 विद्यार्थी 12 वीच्या परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत, तर 10 वीचे 37 हजार 368 विद्यार्थ्यी परीक्षा देणार आहेत.
कोणत्याही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणार्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित घटकांची फेसीयल रिकगनायझेशन यंत्रणेद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्याच 12 वासाठी 50 परीक्षा केंद्र आहेत, तर 10 वासाठी 75 परीक्षा केंद्रांचा समावेश आहे. प्रत्येक तालुक्यात एक पथक नियुक्त करण्यात आले आहे. तसेच पाच भरारी पथक परीक्षा केंद्रांवर नजर ठेवणार आहेत. रायगड जिल्ह्यात माध्यमिकचे चार आणि उच्च माध्यमिकचे दोन परीक्षा केंद्र संवेदनशील आहेत. तर 48 केंद्र उच्च माध्यमिकची आणि 71 केंद्र माध्यामिकची असंवेदनशील आहेत.
परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडाव्यात यासाठी महाराष्ट्र सरकार व मंडळ प्रयत्नशील आहे. यासंदर्भात मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग प्रधान सचिव आणि शिक्षण आयुक्तांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दूरचित्र प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली.
संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराद्वारे परीक्षा केंद्राची निगराणी करण्यात येईल. परीक्षा सुरू होण्याअगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का? याची जिल्हा प्रशासनाकडून खात्री केली जाईल. परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येईल.
जिल्ह्यातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचार्यांच्या सहायाने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके व बैठी पथके उपलब्ध होतील. याचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच विभागीय मंडळामार्फत परीक्षेशी संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येईल. परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत, तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात येईल. महाराष्ट्र गैरव्यवहार प्रतिबंध कायद्याची अंमलबजावणी व कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास, गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणार्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येईल.