वहिवाटीचा रस्ता बंद केल्यामुळे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना निवेदन
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील उद्धर येथील कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या रमेश फाटे यांच्या अनेक वर्षांपासून पिढीजात वहिवाटीचा जाण्या-येण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आम्हा वृद्ध दाम्पत्याला मानसिक व शारीरिक त्रास सोसावा लागतोय. न्यायासाठी आम्ही शासनदरबारी झगडतोय, मात्र आम्हाला न्याय मिळत नाही. आमची होणारी मुस्कटदाबी आता असह्य झाली असून, आम्हाला न्याय न मिळाल्यास आत्मदहन करु, असा गंभीर इशारा रमेश फाटे यांनी दिला आहे. या तक्रारीचे निवेदन रायगड जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक रायगड यांना देण्यात आले आहे.
उध्दर, ता. सुधागड येथे वहिवाटेच्या जागेत घराकडे जाणा-येणारा रस्ता उध्दर येथील रहिवासी अक्षता नरेंद्र खंडागळे यांनी बंद केलेला आहे. त्यामुळे आम्हाला घराकडे जाण्यासाठी फार मोठी अडचण होत आहे. याबाबत त्यांना अनेकवेळा सांगूनसुद्धा त्यांनी अद्यापही ते बांधकाम काढलेले नाही. याबाबत ग्रामपंचायत उध्दर यांच्यादेखील सदर बाब ही निदर्शनास आणून दिलेली असून, त्यांनादेखील पत्र देऊन देखील कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. आम्ही तहसीलदार, गटविकास अधिकारी व पाली पोलीस ठाणे यांच्यादेखील ही बाब लक्षात आणून त्यांनी कुठल्याही प्रकारचे सहकार्य केलेले नाही, असे तक्रारदार रमेश फाटे यांनी म्हटले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन या गंभीर तक्रारीची दखल घेऊन नेमकी काय कारवाई करणार, याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.