नोव्हेंबरमध्ये नगरपालिका, तर डिसेंबरमध्ये होणार जिल्हा परिषदेचे मतदान
| मुंबई | प्रतिनिधी |
दर वीस दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची माहिती समोर आली आहे. नोव्हेंबरमेध्ये नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. तर, त्यानंतर 20 दिवसांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका, तर शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
जानेवारीच्या शेवटापर्यंत सर्व निवडणूका पूर्ण करण्याची राज्य निवडणूक आयोगाची तयारी सुरु आहे. जिल्हा परिषद सदस्य आणि अध्यक्षपदाची सोडत काढण्यात आली आहे. काही दिवसांत महापालिका आरक्षणाची सोडत निघणार असून, प्रभाग रचनेला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे नोव्हेंबरपासून स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रशासन राज संपुष्टात येऊन लोकप्रतिनिधींचे राज्य येणार आहे.
राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नगर विकास विभागांचे अपर मुख्य सचिव डॉ. के.एच. गोविंदराज, उपसचिव प्रियांका कुलकर्णी, छापवाले, उपसचिव विद्या हम्पय्या, अनिरुद्ध जेवळीकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यातील 247 नगरपरिषदांपैकी 33 पदे अनुसूचित जातींसाठी व 11 पदे अनुसूचित जमातीसाठी आणि 67 पदे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाली आहेत. तर, 136 पदे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.







